बीड (रिपोटर)ः- बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात या वर्षी अत्यंत कमी पाऊस पडला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आतापासूनच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू लागल्या. पाणी पुरवठा करा म्हणून अनेक गावातून मागणी होवू लागली. जिल्ह्यातील 111 विहीरी पाण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाडयाला दुष्काळ नवा नाही. तिन वर्ष पाण्याची टंचाई भासली नाही. यंदा मात्र पाण्यासाठी नागरीकांचे हाल होणार आहे. पाणी पुरवठ्या संदर्भात जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातल्या बोटावर मोजण्या इतक्या तलावात पाण्याचा काही प्रमाणात साठा असून इतर तलावे कोरडे आहे. पाऊस कमी पडल्याने खरीप पिकाचं नुकसान झालं. रब्बी पिकालाही फटका बसणार असून दोन्ही हंगामातील विविध पिकाचे उत्पादन घटणार आहे. काही ठरावीक भागात रब्बीची पेरणी झाली. रब्बीचं पिक येईल याची शाश्वती नाही. पाणी पिण्यासाठी महत्वाचे असून वाड्या वस्त्या, तांडयावरील नागरीकांना पाणी पुरवठा करण्यासाठी आतापर्यंत 111 विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ येणार आहे. मार्च, एप्रिल, मे, जुन हे चार महिने कठीण जाणार आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अजुन कुठलीही ठोस भूमीका घेण्यात आली नाही. अधिवेशन संपण्याच्या पुर्वी दुष्काळी भागासाठी शासन काय देते याकडे लक्ष लागून आहे.