गणेश सावंत -9422742810
रामायणात काय आहे? यापेक्षा रामायणात काय नाही? असे विचारायला हवे, रामायणात अखंड संसाराला, त्यागाला अन् संघर्षाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि तेच रामायण ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. प्रभू श्रीरामाचा अश्वमेध यज्ञ पुर्ण झाला होता. प्रभू रामाचे सार्वभौमत्व सिद्धीस गेले होते. चराचरात अन् मनामनात आनंद कल्लोळ दाटून आला होता. आनंदाला, उत्साहाला भरती आली होती. अवघी अयोध्यानगरी फुलांनी सजली होती. दारात सडा आणि त्यावर रांगोळ्या उठून दिसत होत्या. या महायज्ञासाठी आणि आनंद सोहळ्यासाठी अयोध्येत माणसांचा जनसैलाब उसळला होता. अबालवृद्ध, स्त्री-पुरुष, नर-नारी, बालके नव्हे नव्हे तर पशु-पक्ष्यांचा किलबिलाटही आनंदाची साक्ष देत होता. प्रभू श्रीरामांनी या सोहळ्यासाठी वाल्मिकींना निमंत्रण दिलं होतं. वाल्मिकी ऋषी आपल्या सोबत दोन चिमुकल्यांना अयोध्येत घेऊन आले होते. त्या चिमुकल्यांचे तेजोमय चेहरे, त्यांच्या डोळ्यातली प्रभू रामांसारखी अथांग आणि विशाल नजर जो तो रोखून पाहत होता. हे दोन बालके या आनंद सोहळ्यामध्ये वाल्मिकींनी रचलेले काव्य आपल्या सुमधूर आवाजात गाणार होते. जेव्हा मावळतीचा सुर्य उगवतीच्या सुर्याला वंदन घालण्यासाठी निघाला, संध्या समय आली, तसे या दोन बालकांनी आपल्या सुमंजूळ आवाजात वाल्मिकींचे काव्य गाण्यास सुरुवात केली. वाल्मिकींचे हे काव्य म्हणजे नवसुरांंचे कारंजे उडवणारे आणि सप्तसुरात सप्तरंगाचे इंद्रधनूष दाखवणारी जणू प्रतिभाच या महाकाव्यात रंगली होती, श्रोता स्तब्ध होता. वाल्मिकींची अप्रतिम रचना सुमधूर आवाजात ऐकणार्या त्या श्रोत्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहत होते. ते अश्रू एकीकडे आनंदाचे दवबिंदू होत होते तर दुसरीकडे दु:खाचे उष्ण अश्रूही त्यात होते. ज्या अश्रुंना ना वाचा होती ना अंत होता. प्रभू रामाच्या वनवासाचे अणि सीतामाई त्यागाचे सत्य डोळ्यांची पापणी कोरडी पडू देत नव्हती. त्या बालकांच्या सुमधूर आवाजात त्या त्या प्रसंगाचे अधिक मर्म काळजाला भिडत होते. अवघी सभा बालकांच्या सुरांनी वाल्मिकींच्या शब्दांनी तल्लीनतेत बुडून गेली होती. रामायण गाण्यासाठी ज्या बालकांना बोलवण्यात आले होते ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, दस्तुरखुद्द प्रभू श्रीरामाचे पुत्र लव-कुश होते. वाल्मिकींनी जेव्हा प्रभू रामाला त्यांची ओळख करून दिली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. उपस्थितांच्या आनंदाला भरती आली. पण लव-कुश या जुळ्या मुलांचे ज्या सीतामाईने पालन-पोषण केले, त्यांच्यावर उदात्त उन्नत संस्कार केले ती त्यांची आई रामाची पत्नी कोठे होती? हा प्रश्न उपस्थितांना नव्हे नव्हे तर प्रभू रामांनाही पडला असावा. या
रामायणाचा पाया त्यागधिष्ठात
आहे. हे त्या काव्यातून उघड उघड दिसून येत होते. लव-कुशांनी गायिलेले वाल्मिकींचे रामायण आणि त्यामध्ये अखंड चौदा वर्षाच्या वनवासाचा आजच्या शब्दात आँखो देखा हाल उपस्थिांना स्वस्थ बसू देत नव्हता. ज्याला त्याला सीतामाईची आठवण येत होती. मात्र लव-कुशाच्या या सुमधूर आवाजातल्या रामायणातून आम्ही त्याधिष्ठतेचा धडा घेतला. बघा ना, रामराज्य त्याग करतो, भरत सिंहासन त्याग करतो, लक्ष्मण-सीता वुख वैभवाला नाकारतात. स्वामी भक्त हनुमान त्यागमूर्तीच असतो बिभिशन लंकेचा त्याग करतो, सारी वानर सेना जिवित त्याग करते, अथांग सागर अहंकाराचा त्याग करतो. म्हणजेच प्रभू रामाच्या छायेत जो जो जातो, जो जो येतो तो तो त्याग नगरीचा नागरीक होऊन जातो. म्हणूनच
प्रभू राम सत्य
राम सत्ता नव्हे,
जिथे प्रभू रामानेच सत्ता नाकारली, जथे भरताने सत्ता नाकारली तिथे सत्ताला नव्हे सत्येला अधिक महत्व म्हणावे लागेल. प्रभू रामाने राज्य त्याग केला आणि त्याचा राज्य त्याग हा तुमचा-आमचा राम ठरला. रामायणात प्रत्येक पात्र आणि प्रत्येक घटना ही अनन्यसाधारण आहे. सुख असो की दु:ख त्यामध्ये सत्य हे मात्र अधिक प्रकर्षतेने आहे. या रामायण महाकाव्याचा आणखी एक विशेष भाग आपल्याला पहायला मिळेल तो म्हणजे यातील प्रत्येक पात्र हे सतत दु:खाच्या छायेतच वावरत असते. दशरथ, कौशल्या, सुमित्रा, कैकयी, राम, लक्ष्मण, सुग्रीव, सीता, बिभिशन, रावण यासह या रामायणातले कुठलेही पात्र घ्या ते दु:खांकीत आहे, दशरथाला जसे पुत्रवियोगाचे दु:ख, भरताला बंधू विरहाचे दु:ख, कैकयीला अंधपतीत दु:ख, उर्मिलेचे मुख दु:ख, लक्ष्मणाचे वैफल्य दु:ख, सीतामार्सचे अंत नसलेले दु:ख बिभिशनाचे कर्तव्य दु:ख, रावणाचे अहंकार दु:ख आणि प्रभू श्रीरामाचे दिव्य दु:ख यात जरी असले तरी पदोपदी इथल्या प्रत्येक पात्राने सत्तेला नव्हे सत्याला अधिक महत्व दिले. म्हणूनच रामायण आजही अजरामर ठरले अन् प्रभू राम हे वंदनीय.
(क्रमश: उद्याच्या अंकात प्रभू रामाचा जन्म अन् प्रभू रामाचा चंद्र)