पंकजांची पहिली प्रचार फेरी संपली, शरद पवारांनी अद्याप उमेदवारच दिला नाही तर वंचीतच्या घोषणेने बीड जिल्ह्याला तिसरा पर्याय
बीड (रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्या बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक तिरंगी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाने 20 दिवसांपूर्वीच उमेदवार घोषीत केला असला तरी अद्यापपर्यंत शरद पवारांकडून उमेदवाराची घोषणा झाली नाही. त्यात वंचीतचे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर आता बीड लोकसभा मतदारसंघातून वंचीतचा उमेदवार येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या निवडणुकीत वंचीतच्या उमेदवाराने तब्बल 92 हजार मतदान घेतले होते. निवडणुकीपूर्वी गेल्या दोन महिन्यात बाळासाहेब आंबेडकरांचा बीड जिल्ह्यात दोन ते तीन वेळेस वावर झालेला आहे आणि एक जाहीर सभाही आंबेडकरांनी बीडमध्ये घेतली होती.
भाजपाकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा 20 दिवसांपूर्वी झाली. पंकजा मुंडे यांचा एक प्रचार दौराही पुर्ण झाला, मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अद्याप उमेदवार दिला नाही. बजरंग सोनवणे की शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यावर चर्चा-खलबते शरद पवार गटाचे सुरू आहेत. ज्योती मेटे या उमेदवार म्हणून आल्या तर बीड लोकसभेत तगडी फाईट होईल, असे सर्रासपणे बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवारांकडून उमेदवार कोण येतो? याची उत्सुकता बीड जिल्ह्यालाच नव्हे तर राज्याला आहे. अशा परिस्थितीमध्ये वंचीतचे बाळासाहेब आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत युती फिस्कटली आणि त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली. राज्यामध्ये बहुतांशी जागा बाळासाहेब आंबेडकर हे लढवणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचीतने उमेदवार दिला होता तेव्हा बीड लोकसभा मतदारसंघात वंचीतला 92 हजारापेक्षा अधिक मते पडली होती. या वेळेस बाळासाहेब आंबेडकर हे गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्यात अनेक वेळा आले आहेत. बीडमध्ये एक जाहीर सभाही आंबेडकरांनी घेतली होती. त्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या सर्व अनुषंगाने बीड लोकसभेत तिरंगी फाईट होण्याची दाट चिन्हे दिसून येत आहे.