‘ये निकले थे बंद करने तवायफो के कोठे मगर सिक्को की खणक सुनकर खुदही मुजरा करने बैठे’
दबावतंत्रातून मित्र पक्ष संपवणे हा भाजपाचा अजेंडा
हा महाराष्ट्र आहे, झुकणार नाही -प्रा.नवले
बीड (रिपोर्टर): भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाला संपवत असल्याचे सांगत दबावतंत्र वापरून मित्र पक्षांना संपवणे हा भाजपाचा अजेंडा असल्याचा आरोप माजी मंत्री सुरेश नवले यांनी करत हा महाराष्ट्र आहे इथे भाजपाचा हा अजेंडा चालणार नाही, असे म्हणत उमेदवार बदलले तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे नवलेंनी म्हटले. एवढेच नव्हे तर भाजपावर जळजळीत टीका करताना ‘ये निकले थे बंद करने तवायफो के कोठे मगर सिक्को की खणक सुनकर खुदही मुजरा करने बैठे’ असे म्हणत माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपाच्या कथनी करवर भाष्य केले. सुरेश नवले यांच्या भाजप टीकेवरून महायुतीत शिंदे शिवसेना भाजपावर नाराज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
पुढे बोलताना सुरेश नवले माध्यमांना म्हणाले, भारतीय जनता पार्टीला जे लोक नको आहेत ते बदलले पाहिजेत, म्हणून सर्वेचे कारणे पुढे देत आहेत. सर्वेमध्ये शिंदे गटाचा उमेदवार कसा मागे आहे, लोकांमध्ये त्या उमेदवाराची इमेज कशी आहे, याचा रिपोर्ट कसा आला आहे, भाजपाने केलेल्या सर्वेमध्ये उमेदवाराविरोधात कसा रोष आहे हे दाखवून उमेदवार बदलण्याचे सांगितले जाते. ही भाजपाची रणनीती चुकीची आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत, परंतु ते ठाम आहेत. हा विश्वास आम्हाला आहे, असे म्हणत माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपाच्या या एकूण षडयंत्राला मुख्यमंत्री बळी पडणार नाहीत, भाजप ज्या पद्धतीने आमच्या पक्षाची छवी बाहेर निर्माण करत आहे, आमच्या पक्षाविरोधात चर्चा घडवून आणत आहे, तो प्रकार अत्यंत चुकीचा, असेही नवले यांनी म्हटले. माजी मंत्री नवलेंच्या आजच्या या वक्तव्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सर्वकाही अलबेल आहे हे सांगणे कठीण असल्याचे दिसून येते.