बीड (रिपोर्टर): लोकसभेची निवडणूक, प्रचार आणि जबाबदारी अशी रणधुमाळी असली तरीही बीड जिल्हा वासीयांचे हित प्राधान्य क्रम असल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासह आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी मागणी बीड जिल्हा प्रशासनाकडे केली आहेत.
निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने प्रशासन स्तरावर बैठका घेण्यास मर्यादा असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दुष्काळ उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून चर्चा केली. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेले टँकर्स कमी पडत असल्यास लोकसंख्येच्या प्रमाणात टँकर्सची संख्या किंवा खेपा वाढवाव्यात. पाण्याचे स्रोत उपलब्ध नसलेल्या ठिकाणी नव्याने बोअरवेल घेणे, उपलब्ध तलावातील पिण्यासाठी राखीव पाणी, अतिरिक्त पाणी उपलब्ध असलेल्या तलावातील पाणी टप्प्याने शेतीसाठी सोडणे, तसेच जनावरांच्या चार्याचा दर आठवड्याला आढावा घेतला जावा, याबाबतही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे. जिल्ह्यातील ऊसतोड मजूर ऊसतोडणी हंगाम संपवून परत आलेले आहेत, त्यांना रेशन उपलब्ध करून देणे त्याचबरोबर त्यांना तसेच अन्य शेतमजुरांना हाताला काम मिळावे यासाठी मनरेगा अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे आचार संहितेच्या आधीन राहून राबवावीत, याबाबतही धनंजय मुंडे यांनी मागणी केली आहे.