सोलापूर (रिपोर्टर): कॉपीमुक्त परीक्षेसाठी आता दहावी व बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असणार आहेत. या पार्श्वभूमीवर जुलैमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रत्येक केंद्राची तपासणी केली जाणार आहे. त्याठिकाणी असलेले सध्याचे सीसीटीव्ही चालू आहेत का, त्याला बॅकअप (डीव्हीआर) आहे का, याची पडताळणी होईल. परीक्षेच्या ज्या केंद्र शाळा बोर्डाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही बसवणार नाहीत, तेथील केंद्राची मान्यता रद्द केली जाणार आहे.
‘सीबीएसई’ बोर्डाच्या बदलावर राज्य बोर्डाचा बदल अवलंबून असल्याची आजवरील स्थिती आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ची पद्धत सुरु केली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही हा फॉर्म्युला अवलंबला. आता ‘ओपन बूक’ ही परीक्षा पद्धती अवलंबण्याची ‘सीबीएसई’ बोर्डाची तयारी सुरु आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने पुणे बोर्ड देखील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेईल. या पद्धतीत मुलांना परीक्षेवेळी पुस्तकात पाहून उत्तरे लिहिण्यास मुभा असते. पण, प्रश्नांची काठिण्य पातळी वाढवून विद्यार्थ्यांना पुस्तकात सहजपणे उत्तरे सापडतील असे प्रश्न नसतात. या पद्धतीमुळे कॉपी करण्याच्या गैरप्रकाराला कायमस्वरूपी आळा बसेल, असा विश्वास त्या निणर्यामागे असणार आहे. तर दुसरीकडे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर त्यावेळी दोन्ही वर्गाच्या परीक्षांचे स्वरूप बदललेले असणार आहे. सेमिस्टर पद्धतीने त्यावेळी परीक्षा होवू शकतात, असे शिक्षणतज्ज्ञ सांगतात. तुर्तास आणखी काही वर्षे प्रचलित पद्धतीनुसारच बोर्डाच्या परीक्षा होतील.