आठवड्यातील तिसरी घटना; जिल्हाधिकार्यांनी सात दिवसात लेखी अहवाल मागितला
दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? सर्वसामान्यांचा सवाल
डिलेव्हरी वॉर्डातील कर्मचार्यांच्या तोंडाला आधी मुंगसे लावा
गरोदर मातेसह नातेवाईकांना महिला कर्मचार्यांकडून हिन वागणूक

बीड (रिपोर्टर): दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये माता मृत्यूच्या प्रकरणाने उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असताना काल बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मातेची नॉर्मल प्रसुती झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर रात्री सिझर झालेल्या मातेचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. आठवड्यामध्ये बीड जिल्हा रुग्णालयात तीन मातांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली असून बीडच्या माता मृत्यू प्रकरणी नेमके जबाबदार कोण? असा जाहीर सवाल उपस्थित होत असताना आज दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राऊत यांच्या सोबत बैठक घेत येत्या सात दिवसात या प्रकरणाचा लेखी अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत स्पष्ट आदेश दिले. तर माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी पाठक यांनी या प्रकरणात जो कोणी दोषी असेल मग त्यात डॉक्टर, नर्स, भुलतज्ज्ञ, गायनिक डॉक्टर अथवा कोणीही असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
काल छाया गणेश पांचाळ या मातेची नॉर्मल डिलेव्हरी झालेली असताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना ही केवळ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्या दुर्लक्षपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. कालच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आज सोमवार रोजी पुन्हा एका मातेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पांढर बावडी परिसरातील रहिवासी असलेली रुक्मीण परशुराम टोणे (वय 35 वर्षे) ही महिला चौथ्यांदा डिलेव्हरीसाठी रात्री बीडच्या रुग्णालयामध्ये दाखल झाली होती. रात्री तिचे सिझर करण्यात आले. तिला 2 किलो 300 ग्रॅमचे बाळही झाले. महिलेची प्रकृती पाहता तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र आज 14 एप्रिल सोमवार रोजी सकाळी 6.25 मि.च्या दरम्यान उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरील महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रुक्मीन यांना अगोदरच हृदयाचा विकार असल्याचे सांगण्यात येते. ज्या वेळेस त्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाल्या, त्या वेळेस त्यांना रेफर बाबतचा सल्ला देण्यात आल होता. परंतु त्या गेल्या नाहीत. असेही सांगितले जाते. एकीकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील माता मृत्यू प्रकरणाने उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेली असताना बीडच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या आठवडाभरात तीन मातांचा मृत्यू झाला आहे. लागोपाठ काल आणि आज प्रत्येकी एक मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? यावर आता सवाल उपस्थित केले जात आहेत.

जिल्हाधिकार्यांनी सात दिवसात अहवाल
मागितला; कठोर कारवाईचाही इशारा
जिल्हा रुग्णालयामध्ये काल आणि आज प्रत्येकी एक मातेचा बाळांतपणानंतर मृत्यू झाला. याची गंभीर दखल जिल्हाधिकार्यांनी घेतली. आज दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राऊत यांच्या सोबत त्यांनी बैठक घेतली. या वेळी गेल्या आठ दिवसांच्या कालखंडामध्ये जेवढे काही माता मृत्यू झाले त्याचा लेखी अहवाल जिल्हाधिकार्यांनी सात दिवसाच्या आत मागितला. त्याचबरोबर यात जे दोषी असतील मग ते कोणीही असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे म्हटले.
फुप्पुसाच्या संसर्गाने महिलेचा दुर्दैवी मृत्यू -डॉ.राऊत
दोन दिवसांपूर्वी रुक्मीन टोणे या बीड जिल्हा रुग्णालयामध्ये बाळांतपणासाठी दाखल झाल्या होत्या. हे त्यांचे चौथे बाळांतपण होते. त्या दाखल झाल्या तेव्हा त्यांची तपासणी केली असता त्यांना रेफर करण्याबाबत सल्ला देण्यात आला होता. मात्र त्यांच्या नातेवाईकांना इतरत्र हलवले नाही. त्यांना फुप्पुसाचा संसर्ग झालेला होता. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी 2 किलो 300 ग्रॅमच्या बाळाला जन्माला घातल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांची एक टीम अतिदक्षता कक्षामध्ये त्यांच्यावर उपचार करत होती.
कर्मचारी महिलांची भाषा सुधारा
बीड जिल्हा रुग्णालय विविध विषयांबाबत सातत्याने चर्चेत असतं. इथं समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणही होतं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांनी गेल्या आठवडाभरापूर्वी चार्ज घेतला. डॉक्टर साहेबांनी आता एवढच करावं, जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांना रुग्णांसोबत व्यवस्थीत बोलण्याबरोबर रुग्णांना व्यवस्थित सेवा देण्याच्या नुसत्या सूचना देऊ नये तर ते काम प्रत्यक्षात करून घ्यावं. महिलांच्या वॉर्डामध्ये मावशीपासून एमओपर्यंत महिला कर्मचारी गरोदर महिलांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी ज्या पद्धतीने बोलतात ते संतापजनकच.






