एखाद्याच्या मरणावर ठेपताय
तुमच्या धडावर डोकं आहे का?
त्यातला मेंदू अन् मन कुठे आहे?

तुमच्या आमच्या धडावर एक डोकं आहे, त्या डोक्यात एक मेंदू आहे, त्या मेंदूच्या परिसरात एक मन विसावलेलं असतं. त्या मेंदू आणि विसावलेल्या मनाचा शोध आणि अभ्यास जीवशास्त्र, मानसशास्त्राच्या अभ्यासकांना कायम आव्हान देत राहिलंय, मात्र आज कालचे स्वत:ला ब्रह्मज्ञानी समजणारे तथाकथीत कर्मवादींपेक्षा प्रतिक्रियावादी इथे बहुबहल झाले अन् त्यांनी स्वत:च्या मेंदूला मारत मनाला उचंबळ्या देत एखाद्याच्या मरणावर ठेपणे म्हणजे स्वत:च्या मेंदू-मनाची पात्रता दाखवणे होय. गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहतोय, घर फिरलं की जसे वासे फिरतात तसे धनंजय मुंडे यांच्या व्याधीपासून थेट त्यांच्या मृत्यूपर्यंत काही मेंदूने सडके भाष्य करतायत. होय, याआधीही जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सात-आठ वर्षांपुर्वी दोन-तीन वेळा हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होता होता वाचले तेव्हाही आम्ही फडणविसांच्या मरणावर ठेपणार्या लोकांना शब्दाने ठासले होते आणि आताही आम्ही तेच करतोय. कारण आम्ही या महाराष्ट्राच्या मातीत निपजलोत. इथे संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत, राष्ट्रमता जिजाऊंपासून छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचे पाईक आहोत. म्हणून आज आम्ही यावर भाष्य करतोय.
वैचारिक विरोध नक्की असावा, राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोप नक्की करावेत, निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात नक्कीच साम-दाम-दंडाने उभे रहावे, मात्र एखादा व्यक्ती व्याधीने त्रस्त असेल तर त्या व्यक्तीच्या व्याधीची खिल्ली उडवू नये. त्याच्या मरणावर भाष्य करू नये. आपली संस्कृती सांगतेय किंवा आजही आपण एखाद्या दुष्कर्म करणार्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलो तरी तिथे त्याच्या दुष्कर्मापेक्षा त्याच्या चांगल्या कर्माची त्या दिवशी तरी आठवण काढतो. मात्र काहींचा मेंदू असा काही सडला आहे आणि मन असं काही क्लिषीत झालं आहे की ते व्यक्ती मन-मेंदूंच्या सहा भावनांचा आविष्कारच विसरून गेले. मन-मेंदुंचे ते सहा अविष्कार आनंद, दु:ख, राग, भिती, तिरस्कार, आश्चर्य या लोकांमध्ये राहिलेच नाही. त्यांच्याकडे फक्त या सहाही अविष्कारांचा एकच अविष्कार राहिला तो तिरस्कार आणि तोच तिरस्कार मानवी शरीराबरोबर अखंड मानवतेचा भविष्यात व्याधी होऊ शकतो.
जगद्गुरू संत तुकोबा म्हणतात,
घरोघरीं अवघें जालें ब्रम्हज्ञान । परि मेळवण बहु माजी ॥1॥
निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥2॥
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥3॥
निंदा अहंकार द्वेष बहु फार । माजी वरी धूर सारियला ॥4॥
तुका म्हणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥5॥
अर्थ
घरोघरी सगळे ब्रम्हज्ञानी झालेले आहेत,परंतु त्यांच्यात दोषच दोष असतात. जर खरेच कोणाकडे ब्रम्हज्ञान असेल तर मला दुर्बळाला त्या मधील कण भर तरी द्या हो. अहो लोकांच्या मनामध्ये आशा, तृष्णा, माया यांचे मिश्रण झालेले असून त्याच्यातला दंभ लांबूनच दिसतो आहे. त्यांच्या हातामध्ये काम, क्रोध व लोभ हा भरलेला असून हे काळाकुट विष फारच त्रास दायक आहे. अहंकार, परनिंदा व द्वेष या काजळाने त्यांचे जीवन धुरकटलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात अश्या प्रकारच्या ज्ञानाने हाती काहीच लागणार नाहीच परंतु, उलट अनमोल असे मानवी जीवन हे वायाला जाते. तीच स्थिती धनंजय मुंडे यांच्या व्याधीवर आणि मरणावर ठेपलेल्यांची झाली आहे. आम्ही
संस्कार, संस्कृती विसरलोत
आमच्या आई-बापांनी आमचा जन्म झाल्यानंतर पाचवीला जे काही पुजलं असेल, त्याचं थोडं तरी स्मरण, टोकाची कटुता आणि एखाद्याच्या मरणावर ठेपणार्यांनी ठेवायला पाहिजे. तुम्हा-आम्हाला जन्म देताना तुमची-आमची माय अखंड मरणयातना सहन करते आणि जेव्हा आपली नाळ कापते अन् अंडकुळी पाहते तेव्हा तिचा आनंद सर्व वेदना हिरावून घेतो. कारण तुमच्या अंडकुळीत तिला तिचे भविष्य दिसत असते. माझा मुलगा हा कर्तृत्ववान होईल, समाजात त्याचा मान-सन्मान असेल आणि मी त्या कर्तृत्ववान तरुणाला असे काही संस्कार आणि संस्कृती देईल जगाच्या पाठीवर ती धाडसाने म्हणेल, ‘पुत्र व्हावा, ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ मात्र त्याच आईचे मातेचे स्वप्न काही कर्मदरिद्री प्रतिक्रियावादी एखाद्याच्या मरणावर ठेपतात तेव्हा
माणसातलं माणूसपण
संपलाय का?
हा सवाल उपस्थित होतो. गेल्या वीस वर्षांच्या कालखंडात धनंजय मुंडेंच्या राजकीय संघर्षाचा आलेख आणि भोगलेल्या सत्तेचा आलेख यावर नक्कीच भाष्य व्हावे, ज्यांना जे जे वाटते त्यांनी ते ते बोलावे. धनंजय मुंडे यांच्या राजकारणावर, समाजकारणावर नक्कीच टीका व्हावी, टीकाकारांचा तो अधिकार आहे. धनंजय मुंडेंच्या विरोधात नक्की निवडणूक लढवावी, निवडणुकीच्या आखाड्यात काय चिखल फेकायचाय, काय शेण फेकायचं ते फेकावे. परंतु हे सर्व करतानाही आपल्याकडे सुरुवातीपासून नियमावली आहे. कुरुक्षेत्रामधलं महायुद्ध पहा, सुर्य उगवायला आणि कुरुक्षेत्रावर शंखनिनाद झाला की, युद्ध सुरू व्हायचे. सुर्य मावळतीला गेला, अंधाराचं साम्राज्य पसरणार, एवढा वेळ झाला की युद्ध बंद व्हायचे. आता तलवारीच्या आणि भाल्याच्या जोरावर युद्ध होत नसले तरी वाचा आणि वाचाळांच्या जोरावर नक्कीच युद्ध होत आहे, ते होवोही, परंतु एखाद्याच्या मरणापर्यंत कुणी देव पाण्यात ठेवू नयेत. दुश्मन कसा असावा आणि शत्रुच्या मरणावर भाष्य काय असावे, वर्तन काय असावे, हे
शिवरायांचे चरित्र
वाचून तरी समजून घ्यायला हवे होते.
अफजल खानाचा वध छत्रपती शिवरायांनी केला, त्याचं मुंडकं जिजाऊ मॉ साहेबांसमोर नेण्यात आलं, तेव्हा ते मुंडकं दरवाज्यात पुरवून जिजाऊ मॉ साहेबांनी दिवाबत्तीचे आदेश दिले. माणूस मेला, शत्रुत्व संपलं. हे मॉ साहेबांचे शब्द होते. इकडे रायगडावर जेव्हा छत्रपती शिवरायांचे निधन झाले, याची बातमी जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा त्याने जायनमाज अंथरले, वर आकाशाकडे हात केले आणि म्हणाला ‘ऐ अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रख’ शत्रु कसा असावा आणि शत्रुच्या मृत्यूनंतर काय केले पाहिजे हे शिवचरित्रात जिजाऊ मॉ साहेबांकडूनही पहायला मिळतं आणि औरंगजेबाकडूनही पहायला मिळतं, आजची प्रतिक्रियावादी पिलावळ नेमकी कोणाची? ज्यांच्याकडे मान नाही, पान नाही, सन्मान नाही, विचार नाही, आचार नाही, जो तो उठतो आणि एखाद्याच्या मरणावर येऊन ठेपतो हे दुर्दैवी आहे. तुमच्या-आमच्यावर संस्कार या महाराष्ट्राचे आहेत आणि या महाराष्ट्रातील साधू-संत-सुफी समाज सुधारकांचे मावळे आणि पाईक तुम्ही-आम्ही आहोत. अशा परिस्थितीत नक्कीच राजकारणामध्ये विरोधाला विरोध असायला हवा, क्रियेवर -प्रतिक्रिया असायला हवी, आरोप-प्रत्यारोप असायला हवेत, सत्य-असत्य बोलायला हवे, परंतु एखाद्याची व्याधी काढणं अथवा एखाद्याच्या मरणावर ठेपणं ही महाराष्ट्राची नव्हे तर मानवजातीची संस्कृती नाही.









