गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना राज्य सरकारने तात्काळ मदत देण्याची गरज – अजितदादा पवार
३६०० हेक्टरवर सोयाबीन गोगलगायींनी फस्त केल्या,
तीन-चार पेरण्या करूनही काही पदरात येईना
दिल्ली वार्या करण्यापेक्षा मंत्रिमंडळ विस्तार करून शेतकर्यांना
व सर्वसामान्यांना मदत देण्याचे सरकारने मोठेपण दाखवावे
– अजितदादांचा सरकारला सल्ला
अंबाजोगाई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यासह अनेक ठिकाणी सुमारे ३६०० हेक्टरवर सोयाबीन पिकाचे गोगलगायीनी शेंडे खाऊन नुकसान केले; अनेक शेतकर्यांनी ३-४ वेळा पेरण्या करून विविध उपाय मात्र तरीही गोगलगायींचा प्रादुर्भाव आटोक्यात येईना. या पद्धतीच्या नुकसानीचा पीक विमा निकषांमध्ये समावेश नसून, संबंधित शेतकर्यांना तातडीने गोगलगायीचे नियंत्रण करणे व दुबार पेरणीसाठी जमीन तयार करून पेरणी करणे यासाठी विशेष आर्थिक मदत करण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने याबाबत आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा व राज्य सरकारने या शेतकर्यांना विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांनी केली आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत अजितदादा पवार हे आज बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गोगलगायींन्नी उध्वस्त केलेल्या सोयाबीनच्या शेतात जाऊन पाहणी केली व कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून याबाबत माहिती घेतली. अशा प्रकारचे संकट शेतकर्यांना भेडसावल्यास कृषी विभाग विविध तंत्रज्ञान शोधून यावर उपाययोजना शोधणे, शास्त्रज्ञ व्यक्तींना नवीन उपाय शोधायला लावणे, कृषी विद्यापीठातील उपलब्ध माहितीचा विनियोग करणे अशा गोष्टी अपेक्षित असतात, मात्र इथे दोनच व्यक्ती गेल्या एक महिन्यापासून राज्याचे सरकार चालवत असून ते प्रत्येक खात्याशी संबंधित प्रत्येक नागरिकांचे समाधान करू शकत नाहीत, याची त्यांना जाणीव असायला हवी, असेही अजितदादा पवार यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.मंत्रिमंडळ विस्तार नाही, जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत त्यामुळे पीकविमा, कृषी कर्ज, शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे अशा अनेक बाबी प्रलंबित असल्याचेही यावेळी अजितदादा पवार यांनी नमूद केले. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सह आ. सतीश भाऊ चव्हाण, आ. संजयभाऊ दौंड, मा.आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण, राजकिशोर मोदी, गोविंद देशमुख, ताराचंद शिंदे, दत्ता आबा पाटील यांसह अनेक पदाधिकारी, स्थानिक शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील शेतकर्यांच्या समस्या व मागण्या घेऊन आलेल्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन अजितदादा व धनंजय मुंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आ. सतीश चव्हाण, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, माजी आ. अमरसिंह पंडित, मा.आ. पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, अभय मुंडे, चांदूलाल बियाणी, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वैद्यनाथ दर्शन घेतले
सकाळी बीड जिल्ह्यात आगमनानंतर अजितदादा पवार यांनी परळीत वैद्यनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन विधिवत पूजन केले. राज्यातील शेतकर्यांवर ओढवलेल्या संकटातुन शेतकर्यांना सावरण्यासाठी बळ देण्याची प्रार्थना केल्याचे यावेळी अजितदादा म्हणाले.














