
भुजबळ म्हणाले, ‘शेवट चांगला तर सर्व चांगलं’
बीड (रिपोर्टर): राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी भुजबळांचा शपथविधी सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील प्रमुख मंत्री नेते उपस्थित होते. आ. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे सोपविली जाणार आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया देताना ‘ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं’ अशी प्रतिक्रिया दिली.
राज्यामध्ये तीन पक्षांच्या महायुतीला मोठे बलाबल मिळाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने छगन भुजबळांना मंत्रीपदापासून दूर ठेवले होते. तेव्हापासून भुजबळ नाराज होते. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणविसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. याआधी जेव्हा भुजबळ हे सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे अन्न व नागरीपुरवठा खात्याची जबाबदारी होती मात्र नंतर ती जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आली होती. परंतु मध्यंतरी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागेल, असे जानकारांचे म्हणणे होते. अखेर गेल्या सात दिवसांपूर्वी एक बैठक जाली आणि या बैठकीत छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीपद देण्याचे ठरले. त्यानुसार आज राज भवनामध्ये राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये भुजबळ यांना शपथ देण्यात आली.
या वेळी भुजबळ म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही मी ऋण व्यक्त करतो. येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेचे, कार्यकर्ते व पदाधिकार्यांचे, तसेच समता परिषदेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी विशेषतः आभार मानतो. आजवर माझ्यावर प्रेम आणि विश्वास दाखवणार्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मंत्रीपदाबाबतचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच झाला होता. एका बैठकीतच हे निश्चित करण्यात आले होते. सोमवारऐवजी मंगळवारीच शपथविधी होईल, असे तेव्हाच ठरवण्यात आले होते. कारण मंगळवारी मंत्रीमंडळातील नेते व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहू शकतात, त्यामुळेच हा दिवस निवडण्यात आला आहे. ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल , ज्याचा शेवट चांगला त्याचं सर्व चांगलं, असे त्यांनी म्हटले आहे.






