कडा (रिपोर्टर): मान्सूनपूर्व अवकाळीने पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विक्रीसाठी आलेल्य कांद्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्याने शेतातच गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना लिंबोडी येथे रविवारी ( दि. 1) सायंकाळी घडली. गोविंद रंगनाथ आंधळे ( 42) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील शेतकरी गोविंद रंगनाथ आंधळे वय 42 वर्ष यांनी आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. मान्सूनपूर्व अवकाळी पावसामूळे हाताशी आलेला कांदा वाहून गेला. एकीकडे नुकसान तर दुसरीकडे आर्थिक संकट ओढवल्याने डोक्यावरचे उसनवारी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आंधळे होते. यातूनच शेतकर्यांनी रविवारी सायंकाळच्या दरम्यान शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.











