हजारपेक्षा जास्त शिक्षकांचे प्रस्ताव पडून
बीड (रिपोर्टर)- शिक्षण विभागातर्ंगत १२ व २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी देण्यात येते. बीड जिल्ह्यातील तब्बल हजार ते बाराशे शिक्षकांचे याबाबतचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्रस्तावित आहेत, परंतु येथील अधिकारी संबंधित शिक्षकांच्या प्रस्तावात किरकोळ त्रुटी काढून हे प्रस्ताव निकाली काढत नाहीत. विशेष म्हणजे या शिक्षकांना दहावी आणि बारावीचा मार्क मेमो आणण्याचे सांगण्यात येते. सदरचा आदेश हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिल्याचे सांगण्यात येत असल्याने डी.एड. मार्फत शिक्षक झालेल्या या शिक्षकांना वेतनश्रेणी वाढवण्यासाठी दहावी-बारावीच्या मार्कमेमोची गरज काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
दहा ते बारा वर्षे शिक्षक म्हणून सेवा पूर्ण केल्यानंतर चटोपाध्याय त्रिस्तरीय वेतनश्रेणीचा लाभ संबंधित शिक्षकांना दिला जातो. गेल्या दीड वर्षापासून बीडच्या शिक्षण विभागात हजार ते बाराशे शिक्षकांचे वेतनश्रेणी प्रस्ताव पडून आहेत. छाननी करण्याच्या नावाखाली ते प्रलंबीत आहेत. याबाबत शिक्षकांनी संबंधितांना विारले असता त्यामध्ये त्रुटी दाखवण्यात येतात. त्या त्रुटी हास्यास्पद असतात. हजार ते बाराशे प्रस्तावांपैकी केवळ दहा ते पंधराच प्रस्ताव पात्र असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या दीड वर्षापासून हे प्रस्ताव तपासले जात असल्याने अश्चर्य व्यक्त केले जात असून हे प्रस्ताव तपासण्यासाठी ज्या कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते कर्मचारी संबंधित शिक्षकांना दहावी-बारावी उत्तीर्ण झालेले पुरावे मागत आहेत. त्यामुळे प्रस्ताव प्रलंबीत ठेवण्यामागचे खरे गुपित दुसरेच काही आहे का? यात आर्थिक व्यवहार होणार आहे का? यासह अन्य प्रश्न उपस्थित होत असून डी.एड. झाल्यानंतर शिक्षक झालेल्या उमेदवारांची पदोन्नती करण्यासाठी दहावी-बारावी उत्तीर्णचा पुरावा मागणे हे हास्यास्पद असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते. सदरचा प्रकार हा थेट मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशावरून होत असल्याचे संबंधित प्रस्ताव तपासणारे अधिकारी, कर्मचारी सांगतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सदरचे प्रकरणे निकाली काढावेत, अशी मागणी होत आहे.