;

शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली, शेतकर्यांना बसणार मोठा आर्थिक फटका
गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून, पाणी शिवारात शिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापूस, सोयाबीन यांसारखी मुख्य हंगामी पिके मोठ्या प्रमाणात जलमय झाली असून, शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील तलवडा, सिरसदेवी, चकलांबा, हिरापूर, उमापूर, धोंडराई, पाडळसिंगी या भागात अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून, गोदाकाठच्या गावांमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण शिवारात पाणीच पाणी झाले आहे.
गेवराई शहरालगतचा गोविंदवाडी तलाव तुडुंब भरला असून, जातेगाव, सिरसदेवी, पाडळसिंगी, उमापूर व डोंगर पायथ्याजवळील लहान-मोठे तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. तालुक्यातील पाण्याच्या परिसंस्था पूर्ण क्षमतेने भरून ओसंडू लागल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, नंदपूर, काठोडा, पाडळसिंगी परिसरातील शेत पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रातील कापूस व सोयाबीन पिके पाण्याखाली गेली असून, शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकर्यांच्या मेहनतीवर पाणी फिरल्याने मोठे आर्थिक संकट त्यांच्या माथी आले आहे.
या पार्श्वभूमीवर तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.









