
1162.36 टीएमसी पाणीसाठा
पुणे (रिपोर्टर): कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली आहेत, 2997 धरणांत 1162.36 टीएमसी म्हणजेच 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणे तुडुंब भरल्याने नद्यांना विसर्ग सोडण्यात आला आहे.
गेल्या वर्षी राज्यातील धरणांत 69 टक्के एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास 12 टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. सध्या राज्यातील पावसाचा जोर गुरुवारपासून काहीसा कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांत अजूनही येवा सुरूच आहे.
कोकणात धरणे भरली
कोकणात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भात खाचरे भरून वाहू लागली असून, ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहे. कोकणातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, जगबुडी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर मुंबई महानगर पालिकेअंतर्गत असलेली आणि इतर अनेक धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली आहेत.
अजूनही या भागात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. त्यामुळे भातसा धरणातून 702 क्युसेक, सूर्या (कवडास) 7179, वैतरणा (अप्पर) 7119, जगबुडी नदी (कोकण) 419, गडनदी(कोकण) 3255, सातंडी नाला (कोकण) 4721 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे.
जलसंपदा विभागाकडून धरण बांधताना प्रत्येक धरणनिहाय नियमन पाणीपातळीची सूची तयार केलेली असते. यामध्ये धरणाचे व्यवस्थापन, पाणी सोडण्याची वेळ आणि पाण्याची पातळी विशिष्ट मर्यादेत ठेवण्यासंबंधी माहिती असते.प्रामुख्याने नियम वक्र, कमाल पाणीपातळी, जिवंत साठा, मृत साठा, सील लेव्हल धरणाचे पाणलोटक्षेत्रात पडणारा पाऊस, धरणात येणारी आवक याचा विचार करून धरण पाणी पातळी नियमन सूची तयार केली जाते. धरणात तळापासून ते महत्तम तलांकापर्यंतच्या उंचीची गेज पट्टी बसवलेली असते. त्याद्वारे धरणातील पाणीसाठा नियमन सूचीमध्ये वेळोवेळी नोंदवला. जेव्हा धरण भरले जाते, त्या वेळी पाणी सोडले जाते. पाणी सोडताना वेगवेगळ्या आकाराच्या असलेल्या दरवाज्यातून पाणी सोडले जाते. त्यापूर्वी चार ते पाच तासांपासून तयारी करून त्याची जलसंपदा विभागामार्फत महसूल, पोलिस प्रशासनाला कळवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्यासाठी नदीकाठच्या गावांतील प्रशासनाला महसूलमार्फत कळवून दवंडी देण्यात येते. तसेच जलसंपदा विभागाच्या उचित यंत्रणेकडून वाहनाद्वारे, सोशल मीडियावर मेसेजद्वारे सतर्क करून पाणी सोडले जाते, अशी माहिती जलसंपदा विभागाचे माजी अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली.





