बीड (रिपोर्टर) मंत्रिपदापासून दूर ठेवलेल्या बीड जिल्ह्याचे पालकत्व देताना भारतीय जनता पार्टी सत्ताकारणाचे बेरजेचे राजकारण करणार की, बंडखोर शिवसेनेला हातपाय पसरवण्यासाठी बीड आंदण म्हणून सोडणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. बंडखोर शिवसेनेच्या मंत्र्यांकडे बीडचे पालकत्व जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा होत असून संदीपान भुमरे यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी टाकली जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र बीडच्या शिंदे समर्थकांनी तानाजी सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी केल्याचे सांगण्यात येते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीडमध्ये कुठल्या समिकरणाचं राजकारण खेळतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
राज्यामध्ये स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राजकीय फायद्या-तोट्याच्या समीकरणात मंत्रिमंडळाची स्थापना केली. 40 वर्षात प्रथमच बीड जिल्ह्याला मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले. राजकीय सारीपाटावर कायम वर्चस्व राखणार्या बीड जिल्ह्याला भाजपाच्या अंतर्गत राजकीय निती-कुटनीतीचा फटका एकप्रकारे जिल्ह्याला बसला आहे. आता बीड जिल्ह्याचे पालकत्व राजकीय बेरजेच्या समीकरणातून भाजप स्वत:च्या मंत्र्याकडे देणार की बंडखोर शिवसेनेला बीड जिल्हा आंदण म्हणून सोडणार यावर चर्चा होत असताना बीड जिल्ह्यातून शिंदे गटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि सचिन मुळुक हे शिंदेंसोबत गेले आहेत. इ.स. 1995 सालच्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये मंत्री म्हणून राहिलेले प्रा. सुरेश नवले यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपापासून दुखावलेले काही वरिष्ठ नेतेही शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून फडणवीस बीडच्या राजकारणावर पालकमंत्र्यांद्वारे कुठली खेळी खेळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. फडणवीस आपल्या पक्षातील मंत्र्याला बीडचे पालकमंत्रीपद देतात की, शिंदे गटाकडे बीडचे पालकमंत्रीपद सोपवतात यावर चर्चा होत असताना शिंदे गट बीडचे पालकत्व स्वीकारण्याबाबत उत्सुक असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तीन मंत्रिपद दिल्यामुळे बीडचे पालकमंत्री म्हणून संदीप भुमरे यांच्यावर जबाबदारी टाकली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यात बीड, उस्मानाबादसह लातूर या जिल्ह्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. शिंदे गटाच्या मंत्र्याकडे बीडचे पालकत्व जाणार या चर्चेला बीडच्या शिंदे गटाकडून पुष्टी मिळत असून शिंदे समर्थकांनी जिल्ह्याचे पालक म्हणून तानाजी सावत यांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे.