
निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची मागणी
वडवणी (रिपोर्टर): डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित होत असून सरकार या गंभीर प्रकरणाला दडपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप-प्रत्यारोप एकीकडे होत असताना आज खा. सुप्रिया सुळे यांनी संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचबरोबर खा. सुळे यांनी काही सवाल उपस्थित करून सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घ्यावे, असे म्हटले. सुळे म्हणाल्या, या प्रकरणातील सीडीआर रिपोर्ट लिक कसा झाला? या प्रकरणाचा तपास निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली. त्याचबरोबर आज सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणीही पोलीस प्रशासनाकडून माहिती घेतली. मयत महादेव मुंडे यांच्या पत्नीशी चर्चा करून जिल्हा पोलीस अधिक्षक व महादेव मुंडे हत्या प्रकरणातील चौकशी अधिकारी पंकज कुमावत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.
एक माणुसकीच्या नात्याने या घटनेकडे पाहिलं पाहिजे. सरकारमधील काही नेत्यांकडून अतिशय असंवेदनशीलपणे काही विधाने करण्यात येत आहेत, हे अतिशय दुर्देवी आहे. या घटनेतील मुलगी कर्तुत्वान मुलगी होती. दुर्देवाने कुठेतरी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फलटणच्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांशी आम्ही बोललो तेव्हा समजलं की पूर्ण विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी स्थापन करा आणि त्या एसआयटीची जबाबदारी एका निवृत्त न्यायाधीशांकडे देऊन या प्रकरणाचा तपास करा. पीडित कुटुंबियांना न्याय देण्याची नैतिक जबाबदारी राज्य सरकारसह आपल्या सर्वांची आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
खासदार बजरंग सोनवणे आता दिल्लीत जातील तेव्हा ते गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन या प्रकरणातील वास्तव ते त्यांना सांगतील. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊ नका. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही माणुसकीच्या नात्याने या पीडित कुटुंबियांबरोबर आहोत. कोणत्याही गुन्ह्यात ज्याने कोणी जो गुन्हा केला, अशा प्रकरणांमध्ये कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे, ज्याने गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.






