अश्लील आणि हिंसक कंटेंटच्या मार्यात वाढणारी पिढी नेमकी कोणत्या दिशेने चालली आहे?
गणेश सावंत/9422742810
समाज कधी बिघडतो हे मोठ्या घटनांनी कळत नाही; ते छोट्या दुर्लक्षातून सुरू होते.आणि जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा उशीर झालेला असतो.अंबाजोगाई तालुक्यात घडलेली घटना ही केवळ गुन्हेगारी बातमी नाही. ती समाजाच्या सामूहिक अपयशाची नोंद आहे. अवघ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या नात्यातील दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला .ही ओळ लिहितानाच मन सुन्न होते. पण याहून अधिक धक्कादायक बाब म्हणजे तपासात समोर आलेली माहिती , तो मुलगा सतत अश्लील व्हिडिओ पाहत होता.म्हणजे प्रश्न एका मुलाचा नाही.प्रश्न आहे . आपण पुढची पिढी नेमकी काय पाहत मोठी करत आहोत? पारतंत्र्याच्या काळात लोकजागृतीसाठी देश भक्तीवर गीत गायले जायचे, पथनाट्य सादर केले जायचे,लोककलावंतांच्या माध्यमातून समाज जागृती व्हायची, स्वातंत्र्याच्या काळाततमाशा, भारुड, कीर्तन चित्रपट, नाटकातून लोकांचे प्रबोधन व्हायचे त्याचा लोकमानावर प्रभाव ही पडायचा एखाद्या

नाटकाचा प्रभाव
पहायचा असेल तर हे उदाहरण पाहा मोहनदास करमचंद गांधी नावाचा अवघा सात वर्षांचा मुलगा एकदा राजा हरिश्चंद्र या नाटकाला गेला. त्या नाटकातील सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि त्यागाने त्या बालमनावर इतका खोल परिणाम केला की त्या मुलाने आयुष्यभर सत्य आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारला. पुढे तोच मुलगा जगाला महात्मा गांधी म्हणून ओळखला गेला.एक नाटक एका मुलाला महात्मा बनवू शकते, तर आजचा प्रश्न अधिक भयानक आहे .सतत हिंसा, अश्लीलता, विकृती आणि गुन्हेगारी पाहणारी पिढी उद्या काय बनणार?आजच्या डिजिटल युगात मुलांच्या हातात मोबाईल आहे, पण त्या मोबाईलमध्ये संस्कार नाहीत. सोशल मीडियावर दिवस-रात्र मारामार्या, अश्लील दृश्ये, लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे व्हिडिओ, बदनामी करणारे क्लिप्स आणि विकृत मनोरंजन यांचा अक्षरशः पूर आला आहे. प्रश्न असा आहे की, हे सातत्याने पाहणार्या बालमनावर कोणते संस्कार होत आहेत? जगद्गुरु तुकोबा म्हणतात शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी बीज शुद्ध असेल तर त्या झाडाला फळही तसेच गोड आणि रसाळ लागेल मग आपल्या मुलानी सोशल मीडिया च्या माध्यमातून सातत्याने दिवस-रात्र मारामार्या, अश्लील दृश्ये, लैंगिक उत्तेजना निर्माण करणारे व्हिडिओ, बदनामी करणारे क्लिप्स पहिल्या तर काय होईल
अंगावर काटा आणणारे उत्तर
अंबाजोगाई तालुक्यात घडलेली घटना या प्रश्नाचे अंगावर काटा आणणारे उत्तर देऊन जाते. अवघ्या 15 वर्षीय मुलाने आपल्या नात्यातील दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. तपासात त्याने अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे समोर आले. ही केवळ गुन्ह्याची बातमी नाही; ही समाजाच्या सामूहिक अपयशाची कबुली आहे.
आपण मुलांच्या हातात मोबाईल दिला, पण विवेक दिला का?आपण इंटरनेट दिले, पण मूल्ये दिली का?
आज सोशल मीडियाच्या भिंतीवर कोणत्याही घटनेचा निषेध कमी आणि त्या घटनेचे कथित व्हिडिओ शोधणार्यांची संख्या अधिक दिसते. एखादे प्रकरण घडले की पहिला प्रश्न असतो व्हिडिओ आहे का?हा प्रश्नच समाजाच्या मानसिकतेचे विदारक चित्र उभे करतो.
खरात प्रकरण असो किंवा इतर वादग्रस्त घटनांचे कथित व्हिडिओ निषेधापेक्षा व्ह्यूज जास्त मिळतात. म्हणजेच समाजाला सत्यापेक्षा सनसनाटीपणा आणि नैतिकतेपेक्षा विकृत कुतूहल अधिक आकर्षित करत आहे. आज सोशल मीडिया माहितीचे साधन कमी आणि विकृत मनोरंजनाचे व्यासपीठ अधिक बनले आहे.
मोबाईल क्रांतीनंतर आठ-दहा वर्षांच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन सहज पोहोचला. ही पिढी तंत्रज्ञानात प्रगत आहे, पण मानसिकदृष्ट्या अजून घडत आहे. पासवर्ड तोडण्याइतकी हुशार असलेली ही मुले चुकीच्या कंटेंटपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील इतकी परिपक्व नाहीत.मानसशास्त्र सांगते माणूस जे पाहतो त्याचा प्रभाव सर्वाधिक खोलवर पडतो.मग रोजच्या रोज हिंसा, लैंगिकता आणि विकृतीच दिसत असेल, तर त्या मनातून काय उगवेल सत्य की वासना?आज सोशल मीडियावर नियंत्रण नाही, जबाबदारी नाही आणि संवेदनशीलता तर अजिबात नाही. पोस्ट करणार्याला भान नाही आणि पाहणार्याला मर्यादा नाहीत. ट्रोलर्सच्या झुंडी तयार झाल्या आहेत; चारित्र्यहनन हा मनोरंजनाचा भाग बनला आहे.प्रश्न फक्त एका घटनेचा नाही. प्रश्न आहे आपण पुढच्या पिढीला महात्मा घडवतोय की गुन्हेगार तयार करतोय?समाजव्यवस्थेने आता कठोर निर्णय घ्यावे लागतील.पालकांनी मोबाईल देण्याआधी नियंत्रण द्यावे लागेल.शाळांनी डिजिटल नैतिकतेचे शिक्षण द्यावे लागेल.
सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कठोर नियम लागू करावे लागतील.नाहीतर उद्या प्रत्येक गुन्ह्यानंतर आपण पुन्हा तेच म्हणत राहू ही घटना धक्कादायक आहे.
पण खरा धक्का म्हणजे घटना नव्हे, तर ती घडवणारी आपणच निर्माण केलेली मानसिकता आहे.
राजा हरिश्चंद्र पाहून एक मुलगा महात्मा झाला होता.
आज रील्स आणि अश्लील क्लिप्स पाहणारी पिढी उद्या काय होणार – हा प्रश्न आता टाळता येणार नाही.
नाही निर्मळ जीवन
जगद्गुरु संत तुकोबा म्हणतात,नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ चित्तशुद्धी नाहीं । तेथें बोध करील काई ॥ न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥
अर्थ
ज्याचं मन, अंतःकरण निर्मळ नसेल त्याने शरीर कुठल्याही साबणाने धुतले तरी त्याचा उपयोग तो काय त्याचप्रमाणे, ज्याचे मन (चित्त) शुद्ध नाही, त्याच्या मनात चांगले विचार किंवा उपदेश (बोध) रुजणार नाहीत, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
म्हणून आज प्रत्येक पालकाने आपल्या बाल्यावस्थेतील मुलांकडे लक्ष देणे जितके आवश्यक आहे तेवढेच समाज वेवस्थेनेही सोशल मिडियाला विचाराचा भंडार बनवायचा की अश्लीलतेचा अड्डा हे आता ठरवले पाहिजे.











