सांय दैनिक बीड रिपोर्टर मधील आज दिनांक 29 मार्च रविवार अग्रलेख
गणेश सावंत-9422742810
देव आणि धर्माचा उच्चार झाला की हात जोडायचे, डोळे मिटायचे, विचार बंद करायचे हिच जर श्रद्धेची व्याख्या असेल तर समाजाने स्वत:ला फसवण्याची कला एक प्रकारे आत्मसातच केली म्हणा, कारण इतिहास पुन्हा पुन्हा दाखवतो, की देवाच्या नावाने सर्वात जास्त फसवला गेलेला घटक म्हणजे सामान्य माणूस. परंतू इतिहासाबरोबर आजच्या वर्तमानात सामान्यांसह स्वत:ला बुद्धीजीवी उच्चशिक्षित श्रीमंत गर्भश्रीमंत अधिकारी, पुढारी, मंत्री हे सुद्धा जेव्हा बाबा बुवॉच्या विळख्यात आडकतात तेव्हा आजची पिढी अंधश्रद्धेच्या काळोखात आणि धर्मांधतेच्या आगडोंबात अक्षरश: होरपळत आहे. या होरपळण्याचे चटके बसत असले तरी धर्मांधतेच्या नशेने आणि अंधश्रद्धेच्या काळोखाने त्याची जाणीव या लोकांना अद्याप होत नाही. असेच दिसते. श्रद्धा माणसाला उभारी देते परंतू अंधश्रद्धा माणसाला गुलाम बनवते आणि ही गुलामगिरी तलवारीने नाही तर भिती, चमत्कार आणि पाप पुण्याच्या कथांनी निर्माण केली जाते. प्रश्न विचारू नका, हा धर्माचा आदेश नसून सत्तेची यूक्ती आहे. हे समाजाने अजूनही ओळखले नाही. हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. देव काल होता, आज आहे आणि उद्याही राहिल. परंतू त्या देवाच्या नावाखाली जो ढोंगीपणा चालू आहे
ते ढोंग
आधी फोडले पाहिजे. भारतीय संत परंपरा आपण जर पाहिली तर त्यांनी देव नाकारला नाही परंतू देवाच्या नावावर चालणार्या ढोंगीपणावर उघडपणे आसूड ओढले. तथाकथीत ढोंगीबाबांना आणि धर्मांधतेला संतांनी अक्षरश: चाबकाने फोडले. जगद्गुरू संत तुकोबांनी बाह्य अडंबनावर प्रहार केला. संत कबीरांनी मंदिर-मस्जीद दोन्हीवरही प्रश्न उपस्थित केले. संत गाडगेबाबांनी लोकांसमोर उभे राहून स्पष्टपणे सांगितले. देव शोधायचा असेल तर माणसाची सेवा करा म्हणजेच खरी परंपरा प्रश्न विचारण्याची होती. आंधळेपणाची नव्हती. मात्र आज प्रश्न विचारणे म्हणजे महापाप होवून बसले आहे. सत्तेत प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह होत आहे. ही जी परिस्थिती निर्माण केली गेली आहे ती अंधश्रद्धा वाढवण्यासाठी अधिक अधिक पोषक म्हणावी लागेल. इतिहासातील दाखले अधिक कठोर आहेत. युरोपमध्ये चर्चेच्या नावाखाली हजारो महिलांना जादूटोणा म्हणून जीवंत जाळले गेले. भारतात देवदासी प्रथेने धर्माचे अवरण घालून स्त्रीयांचे आयुष्य उद्धवस्त केले. समाज गप्प राहिला, कारण तेव्हा विरोध करणे म्हणजे देवाचा अपमान मानला गेला. आज अधुनिक काळात हे चित्र बदलले आहे का? आजीबात नाही. नाव बदलली, पोषाक बदलले परंतू पद्धत तिच राहिली. स्वत:ला अवतार घोषीत करणारे, चमत्कार दाखवणारे आणि भक्तांच्या भावनांचा बाजार मांडणारे तथाकथीत गुरू पुन्हा पुन्हा जन्म घेत राहिले. आसाराम बापु, गुरूमित रामरहिम यांच्यासारख्या प्रकरणांनी दाखवून दिले की भक्ती जेव्हा विवेकशुन्य होते तेव्हा अत्याचारालाही दैवी रंग दिला जातो. पिडीत व्यक्ती तक्रार करण्याऐवजी मौन बाळगते. कारण तिला देवाचा कोप होईल अशी भिती वाटते.
देव असोनिया देव
वृथा फिरतो निर्दैवं
साधू संतांनी देवाची व्याख्या सत्कर्मात केली आहे. ईश्वर भक्ती नामात केली आहे आणि स्वर्ग एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ यात मानला गेला आहे. असे असतांना गुलामगिरीच्या मानसिकतेत असलेलो आम्ही पुन्हा पुन्हा बुवाबाजीच्या मानगडीत आडकून पडतो. देव आहे आणि तरी आम्ही। व्यर्थ हिंडे तिर्थग्रामी॥ नाभी मृगाची कस्तूरी। व्यर्थ हिंडे वनांतरी॥ साखरेचे मुळ ऊस। तैसे देही देव दिसे॥ तुकोबा म्हणतात, देव हा आपल्या शरीरात असतांना त्यासाठी अकारण अभाग्यासारखं कशाला हिंडतो, देव हा आपल्या आत असतो, त्याला भेटायला तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंडणं हा व्यर्थपणा आहे. कस्तूरी मृगाच्या नाभीत कस्तूरी असते. पण तो उगाचच जंगलात हिंडतो. लोणी हे दुधात असतं पण त्याला घुसळून काढायचं हे या मुर्खांना माहित नसतं. अरे मुर्खांनो, तुका सांगे मुढजना, देही देव का पहाना. एवढं सर्व सांगूनही वर्षानुवर्षे दशकूनदशकं धर्माचा बाजार इथं थांबत नाही. जेव्हा धर्म आणि राजकारणाची सांगड घातली जाते तेव्हा
‘अंधश्रद्धा’ बळकट
होते. हे सातत्याने पहावयास मिळत आहे. आज मितीला राज्यात आणि देशात राजकारण हे जात आणि धर्माशिवाय पुढे जात नाही. निवडणूका आल्या की मंदिर-मस्जीदचे प्रश्न उपस्थित होतात. लोकांच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं. धर्माच्या नावावर, भक्तीच्या नावावर लोकांना एकमेकांसमोर शत्रू म्हणून उभं केलं जातं. इथंच धर्मांधता जेवढी वाढते तेवढेच नव्हे तर त्यापेक्षा अधिखतेने अंधश्रद्धेला बळ मिळते. प्रश्न विचारणारा इथं शत्रू ठरतो. विवेकवादी व्यक्ती धर्मद्रोही ठरते आणि समाज भितीच्या चौकटीत कैद होतो अशा वातावरणात सत्य नव्हे तर भावना राज्य करू लागते आणि जेव्हा भावना राज्य करण्याच्या मुडमध्ये असते तेव्हा राज्यकर्ते लोकांच्या त्या भावनेला सहजतेने कटपूतली बनवतात. दुर्दैवं याचं वाटतं हा महाराष्ट्र विचारवंतांचा महाराष्ट्र, साधूसंतांचा, सूफींचा, समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र. महात्मा ज्योतीराव फुलेंनी शिक्षणाला शस्त्र म्हटले. कारण शिक्षण प्रश्न विचारायला शिकवतो. शिक्षण हे वाघीणीचं दुध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, कारण शिक्षण असेल तर तो प्रश्न विचारेलच. त्यापुढे जात आंबेडकरांनी बुद्धीप्रामाण्याचा आग्रह धरला. त्यामागेही समाज गुलाम राहणार नाही हेच होतं. राजाराम मोहनराय यांनी सतीप्रथा मोडीत काढली. कारण धर्माच्या नावाने अन्याय स्विकारणे हे सर्वात मोठे पाप आहे. एवढे सर्व किंवा या पेक्षा अधिकतेने सत्य घडामोडी तुमच्या आमच्याकडे असतांना आजही आम्ही धर्माच्या नावावर, श्रद्धेच्या नावावर लुबाडले जातो. तेव्हा आजचा
समाज विचाराने
नागवा आणि खोकला
आहे. असे स्पष्टपणे म्हणावे लागेल. अशोक खरातसारखा शिकल्या सवरलेला भामटा धर्माच्या आड आणि भक्ती श्रद्धेच्या भयवल्लीत समाजाला अक्षरश: नागवं करून टाकतो. इथे काहींनी प्रश्न उपस्थित केले. त्या महिलांना कळत नव्हतं का? त्या महिला तेव्हा काही झोपल्या होत्या का? तो बाबा थोडंच त्यांच्याकडे गेला, त्यांच्यावर बळजबरी केली? होय, हे प्रश्न साहजिक उपस्थित होतील. परंतू जेव्हा धर्मांधता, भक्ती भाव श्रद्धा आणि भावना अंगात शिनते तेव्हा व्यक्तीचा विवेक हा संपुष्टात येतो. त्या महिलांना दोष देण्यापेक्षा त्या बाबाला उभारी देणारे जे कोणी उच्च शिक्षित असतील ते खरे यात दोषी. आणि त्यापेक्षाही कमी श्रमामध्ये ज्याला सूख शोधायचंय तो यात सर्वात दोषी, सुख कशाला म्हणायचं? साधन संपत्ती, श्रीमंती की बेडवरची रासलिला? इथं सुख कोणी बिर्याणीत शोधतं तर कोणी साध्या वडापावमध्ये समाधानी होतं. परंतू सुखाची व्याख्या हि जर स्वत: नागवे होत दुसर्याला नागवे करत असं कोणी मांडत असेल तर समाजाच्या प्रत्येक नागरीकांनी नागवं होणार्या त्या बुवा बाबाचं बुटाणी तोंड फोडायला हवं. परंतू ती ताकद तेव्हाच येईल, समाजाने नागवंपण आणि खोकलंपण सोडलं तर. जोपर्यंत श्रद्धा विवेकासोबत राहत नाही तोपर्यंत धर्माचा बाजार तेजीत राहिल आणि भक्तीचा वापर व्यापारासाठी होत राहिल. परिवर्तनाची सुरूवात मंदिर-मस्जीद किंवा चर्चमधून नाही तर माणसाच्या विचारातून होणार आहे. मंदिर मस्जीद चर्च गुरूद्वार शुद्ध मनाने, शुद्ध चित्ताने नास्मरण करण्याहेतू लिन होणं एवढ्यासाठी असावेत.
देव दहशतवादी
मुळीच नसतो. देव कधीही भीती दाखवत नाही. देव कधीही कोणाचं वाकडं करत नाही. जर देव माणसाचं वाटोळं करत असेल, त्याला उध्वस्त करत असेल तर त्या देवात देवपण ते कसलं? हा आमचा प्रश्न आहे. मुळात देवाची व्याख्या सत्कर्मात गुंतली आहे. देवाची भक्ती नामस्मरणात आखली आहे. देव कधी मला हे दे मग तुला मी ते देईल असं म्हणत नाही मग हे सर्व थोतांड करणारे देवाच्या नावावर भाड खाणारे तथाकथीत बुवॉ एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभारी कशी घेतात. बेलाचं पान पुस्तकात ठेवायचं आणि ते पुस्तक उशाखाली ठेवल्याने ज्ञान वाढतं असं जाहीर व्यासपिठावरून सांगितलं जातं हा निव्वळ शुद्ध मुर्खपणा नव्हे काय? तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग, समर्पिता भले अंग॥ ज्या ज्या तिर्थाला जावं तिथं तिर्थ म्हणजे पाणी आणि देव म्हणजे धोंडात असतो देव अशा ठिकाणी नसून तो खर्या चांगल्या सज्जन माणसात असतो म्हणून चांगल्या लोकांची संगत जर भेटत असेल तर आपलं मन तिथेच रमवा असं तुकोबांनी म्हटलं. मुळात देव, ईश्वर, अल्लाह हे कुणामार्फत तुमच्या आमच्यासमोर येणार नाहीत तर ते थेट तुमच्यात आहेत.








