पुणे (रिपोर्टर) अनेकांना दौर्यांची तारीख खुपली, त्यांनीच अयोध्या दौर्या दरम्यान सापळा रचला आहे. माझ्या दौर्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. मला कारसेवकांनी जिथं बलिदान दिलं, त्याचं दर्शन घ्यायचं होतं. पण, माझ्या कार्यकर्त्यांना सडवलं गेलं असतं. मी माझ्या कार्यकर्त्यांना हकनाक गमवणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले असते. त्यांच्यासाठी मी वाट्टेल ती टीका सहन करायला तयार आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी माझ्या कार्यकर्त्यांना गमवायचं नाही, असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर ज्यांनी टीका केली, त्यांना दिलं आहे.
गुजरातमधून हजारो परप्रांतियांना हकललं, कोण माफी मागणार? माफी मागायला गेली 15 वर्षे झोपले होता का? यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, बाकी काही नाही. मातोश्री बंगला हा काय मशीद आहे का? हनुमानचालिसावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये इतका राडा झाला, त्यानंतर हे लडाखमध्ये एकत्र दिसले. या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे. त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वॉशिंग पावडर आहे का?, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले, औरंगाबाद नामांतरावर यु टर्न घेणारे उद्धव ठाकरे कोण आहेत? तुमच्या अंगावर एक तरी केस आहे का? शिवसेनेच्या राजकारणामुळे निझामाच्या औलादी इथं वळवळू लागल्या आहेत. कारण, शिवसेनेला सत्ता महत्वाची वाटते. एमआयएमच्या औलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटतो का? अफजल खानाच्या मशिदीचा किती विस्तार झालाय, ते बघा. आम्ही भोंग्यांचा विषय काढला, तर सकाळाचा आवाज बंद झाला. जो कायदा सांगतो, त्यालाच नोटीशी पाठवता? राज्यातल्या 28 हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीशी पाठवल्या. या विषयावर चर्चा कसल्या करता? , असंही राज ठाकरे म्हणाले.
मनसे प्रमुख राज यांनी 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशमध्ये घुसून देणार नाही, अशी धमकी दिली. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये शक्तीप्रदर्शनदेखील केले होते. त्यानंतर प्रकृतीचे कारण देत ठाकरेंचा अयोध्या दौरा अचानक रद्द करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. मनसेवर विरोधकांकडून टीका होऊ लागली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप होत राहिले. या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुण्यात सभा आयोजित केली आहे. या सभेत राज ठाकरे नेमका कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते.