खामगावात लुटालूट, गावकर्यांनी रात्र जागून काढली, ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची मागणी
गेवराई (रिपोर्टर) गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दरोडेखोरांच्या टोळीने दहशत निर्माण केली असून मध्यरात्रीच्या दरम्यान तालुक्यातील खामगाव येथे दरोडेखोरांनी एका घराला लक्ष्य करत घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या महिलेला मारहाण करत चाकुचा धाक दाखवत घरातील महिलांच्या अंगावरचे दागिने ओरबाडले. सदरच्या दरोडेखोरांनी गावात आणखी दोन ठिकाणी अशीच दहशत निर्माण करून माहाण केली. गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दहा दिवसांपुर्वी याच परिसरातील गोपाळ वस्ती याठिकाणी अशाच चार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत लुटालूट केली होती. या दरोड्याच्या सातत्याच्या घटनांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
गेवराई तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत भरदिवसा दुचाकीस्वारांना लुटले जाते. तर दरोडे, गंभीर चोर्यांसारख्या घटना वारंवार घडत अहेत. तपास मात्र लागत नसल्याने आणि घटना वाढत असल्याने नागरिक दहशतीखाली आले आहेत. तालुक्यातील खामगाव येथे मध्यरात्री चार चोरट्यांनी मधुमाला रमेश वाघ (वय 45) या महिलेचे घर टार्गेट करत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महिलेला मारहाण करत चाकुचा धाक दाखवत दोन ग्रॅमचे डोरले, दोन ग्रॅमचे कानातील फुलं, एक ग्रॅमचे कुडुक, पायातील चैन, एक मोबाईल असा ऐवज लुटला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारील अंकुश रावसाहेब पोटभरे यांच्या घराकडे वळविला. तेथे पोटभरे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली मात्र मधुमाला रमेश वाघ या महिलेने आरडाओरड केल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्याच गाावातील प्रवीण दिलीपराव मचे यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश करत प्रवीण मचे यांच्या पत्नी अलका, भाऊ प्रदीप आणि आई शिलाबाई यांना चाकुचा धाक दाखवून रोख पाच हजारासह मोबाईल घेऊन चोरट्यांनी पळ काढला. गावात एकच खळबळ उडाल्याने संपुर्ण गाव रात्रभर जागे होते. तीन ठिकाणी चोर्या होऊनही पोलिसांनी यायला सकाळ लावली. त्यामुळे ग्रामस्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गेवराई पोलीस निष्क्रीय
एसपी साहेब, सक्रिय व्हा
गेवराई तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांच्या कालखंडात दोन ते तीन दरोड्याच्या घटना घडल्या.
मुद्देमालापेक्षा थेट महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडण्यासाठी दरोडेखोर हात घालतात या घटनांनी परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण झाले आहे. गेवराई पोलीस निष्क्रीय असून तेथील पोलीस निरीक्षक रविंद्र पेलगुलवार यांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही त्यामुळे त्यांचा कार्यकाळ निष्क्रीय होत चालल्याने एसपी साहेब, तुम्ही तरी सक्रिय व्हा आणि गेवराई पोलीस निरीक्षकासह पोलीस यंत्रणेला सक्रिय होण्याचे सांगत परिसराला निर्भय करा.