रांजणीत तरुण शेतकर्याची आत्महत्या
राज्यात दररोज 8 शेतकरी मृत्यूला कवटळतात,
आठ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याच्या घटना
गेवराई (रिपोर्टर) सततची नापिकी त्यात खासगी सावकाराचे आणि बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या चिंतेतून एका 42 वर्षे तरुण शेतकर्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील रांजणी येथे उघडकीस आली. दरम्यान राज्यात दररोज आठ शतेकरी मृत्यूला कवटाळतात. राज्यात आठ जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
अशोक सुखदेव औंढकर असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. रात्री त्यांनी करांडे यांच्या कोठ्यावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच बिट अमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अशोक औंढकर यांच्याकडे खासगी सावकारासह बँकेचे कर्ज आहे. ते कर्ज कसे फेडायचे? या चिंतेत ते गेल्या काही दिवसांपासून होते. रात्री त्यांनी टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, आई-वडिल, एक बहिण असा परिवार आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. राज्यात दररोज 8 शेतकरी मृत्युला कवटाळतात. अमरावती, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, येवतमाळ, बुलढाणा, वर्धा या आठ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्येच्या घटना अलिकडच्या काळामध्ये घडल्या आहेत.