ऑनलाईन रिपोर्टर
आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यानी केला. उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगण्याचे राज्यपालांचे निर्देश हे योग्यच होते असंही ते म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते बहुमत चाचणीसाठी मतदान कसे करणार असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला विचारला. तसेच पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली गेली? असाही सवाल त्यांनी विचारला. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीवर ठाकरे गटाकडून युक्तीवाद पूर्ण झाला असून आता शिंदे गटाच्या वतीनं युक्तीवाद सुरू आहे. ही सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आज सरन्यायाधीशांनी शिंदे गटाच्या युक्तीवादावर काही प्रश्न विचारले. दुपार पर्यंत न्यायालयात काय झाले वाचा
16:38 (IST) 28 Feb 2023
“घड्याळाचे काटे उलटे फिरवायचे असतील, तर…”; कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं मोठं विधान, म्हणाले…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकार कायदेशीर की बेकायदेशीर, १६ आमदार पात्र की अपात्र, हा निर्णय कोण घेणार, राज्यपालांना बहुमत चाचणीचा निर्णय आहे का अशा अनेक मुद्द्यांवर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. याबाबत कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना विचारणा केली असता त्यांनी कायदेशीर गोष्टींवर भाष्य केलं. ते मंगळवारी (२८ फेब्रुवारी) एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
16:38 (IST) 28 Feb 2023
सर्वोच्च न्यायालयात घमासान, एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाकडून शिंदे गटाची कोंडी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात घमासान सुनावणी सुरू आहे. आज (२८ फेब्रुवारी) ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत प्रतोदाच्या नियुक्तीला आव्हान दिलं. यातून ठाकरे गटाने शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
16:37 (IST) 28 Feb 2023
शिंदे गटाच्या व्हिपमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन? कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, “याचा अर्थ…”
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ सुनावणी करत आहे. अशातच मागील सुनावणीत शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या आमदारांना व्हिप बजावला जाणार नाही आणि अपात्रतेची कारवाई केली जाणार नाही, असं आश्वासन न्यायालयाला दिलं. असं असतानाही शिंदे गटाने ठाकरे गटाला व्हिप बजावल्याने न्यायालयाच्या निर्देशांचा भंग झाल्याचा आरोप होत आहे. यावर ज्येष्ठ कायदातज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (२८ फेब्रुवारी) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
सविस्तर वाचा…
16:30 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा युक्तिवाद
सर्वोच्च न्यायालयातील आजचा युक्तिवाद संपला असून वरीष्ठ वकील नीरज कौल उद्या सकाळी पुन्हा युक्तिवादाला सुरुवात करतील. त्यांच्यानंतर मनिंदर सिंग हेही युक्तिवाद करतील. त्यानंतर राज्यपालांची बाजू मांडण्यासाठी सॉलिसिटर जनरल हरिष साळवे युक्तिवाद करतील.
15:45 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: आमदारांनी राज्यपालांकडे जाऊन नाराजी दाखवण्याचा प्रश्नच येत नाही – सरन्यायाधीश
आमदारांनी राज्यपालांकडे जाऊन आम्हाला सत्ताधारी आघाडीमध्ये राहायचं नाही असं सांगण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी पक्षाचा व्हीप पाळून पक्षाच्या निर्णयानुसार धोरण ठरवणं आवश्यक आहे. – सरन्यायाधीश
15:35 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्देशांचा दिला दाखला
सर्वोच्च न्यायालयानेच अनेक प्रकरणात राज्यपालांना असं सागितलंय की अशावेळी सर्वात आधी अधिवेशन बोलवून बहुमत चाचणी घ्यायला हवी – नीरज कौल
15:34 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: न्यायालयाची शिंदे गटाला विचारणा…
राज्यपालांच्या पत्रात फक्त एवढंच म्हटलंय की ७ अपक्षांनी पाठिंबा काढलाय आणि ३४ सदस्य म्हणतायत की त्यांची इच्छा आहे की त्यांना महाविकास आघाडीमधून बाहेर पडायचंय. पक्षामध्ये महिन्याभरापूर्वीपर्यंत कोणतीही फूट नसताना महिन्याभरात ते सरकार विश्वासदर्शक ठरावाचा सामना कसा करू शकते? – न्यायालयाचा शिंदे गटाला सवाल
15:30 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: न्यायालयाचे कौल यांना राज्यपालांचं पत्र वाचून दाखवण्याचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना राज्यपालांचं सरकार स्थापनेवेळचं पत्र वाचून दाखवण्याचे आदेश दिले. कौल यांनी ते पत्र वाचून दाखवलं..
15:27 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: .. अशा सरकारला सत्तेत कसं राहू दिलं जाऊ शकतं? – नीरज कौल
जे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाऊ शकत नाही, अशा सरकारला सत्तेत कसं राहू दिलं जाऊ शकतं? शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा सर्वोच्च न्यायालयात सवाल
15:26 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी फक्त बहुमत सिद्ध करायला सांगितलं – कौल
राज्यपालांनी फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही समोर येऊन तुमचं बहुमत सिद्ध करा. त्यांनी कुणालाही तेव्हा सरकार स्थापन करायला बोलवलं नाही. पण त्यानंतर उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत – नीरज कौल
15:21 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: ७ अपक्ष, ३४ आमदारांनी राज्यपालांना सरकारमधील विश्वास गमावल्याचं सांगितलं – कौल
विरोधी पक्ष, ७ अपक्ष आणि ३४ आमदारांनी राज्यपालांच्या लक्षात आणून दिलं की त्यांचा उद्धव ठाकरे सरकारवर विश्वास नाही. त्यानंतर राज्यपालांनी बोम्मई प्रकरणाप्रमाणे प्रक्रिया पाळत बहुमत चाचणीसंदर्भात निर्देश दिले – नीरज कौल
15:11 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: आमदारांना मतदानापासून रोखता येणार नाही – कौल
फक्त अपात्रतेचं प्रकरण प्रलंबित आहे म्हणून तुम्ही एखाद्या आमदाराला विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापासून रोखू शकत नाही – शिंदे गटाचे वकील नीरज कौल
15:01 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: … त्यांना वगळूनही आम्ही बहुमतात – नीरज कौल
अपात्रतेची कारवाई प्रलंबित असलेल्या आमदारांना वगळूनही आम्ही बहुमतामध्ये आहोत – शिंदे गटाचे वकील नीरज कौल
14:57 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: तुम्ही पक्षाला तुमच्या बहुमताबाबत का नाही सांगितलं? – सर्वोच्च न्यायालय
तुम्ही पक्षाकडे जाऊन सांगितलं का नाही की आता आम्ही मूळ पक्ष आहोत? सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला विचारणा
14:48 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: अपात्रतेशी थेट संबंधित असल्यामुळेच बहुमत चाचणीवर वाद – सरन्यायाधीश
बहुमत चाचणीचं कारण हे थेट अपात्रतेच्या प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे इथे खरी समस्या निर्माण झाली आहे – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
14:47 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: आमदारांची ही भूमिकाच अपात्रतेसाठी कारण ठरत नाही का? – सरन्यायाधीशांचा सवाल
७ अपक्ष आणि ३४ आमदार म्हणत होते की त्यांचा सरकारवर विश्वास नाही. मग जर सरकार पाडण्यासाठी हे कारण ठरलं असेल, तर हे कारणच मुळात अपात्रतेचं मूळ ठरत नाही का? – सरन्यायाधीश चंद्रचूड
14:35 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: सरन्ययाधीसांनी उपस्थित केला बहुमत चाचणीचा मुद्दा!
जर आमदारांची अपात्रताच संशयाच्या भोवऱ्यात असेल, तर मग बहुमताचा प्रश्न कसा उभा राहातो? सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा शिंदे गटाच्या वकिलांना सवाल
14:30 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी अजून काय करायला हवं होतं? – नीरज कौल
राज्यपालांनी नेमकं काय करायला हवं होतं? ७ अपक्ष आमदार म्हणतायत की आमचा सरकारवर विश्वास नाही, ३४ आमदार म्हणतात की त्यांचा मंत्रालयावर विश्वास नाही – शिंदे गटाचे वकील नीरज कौल
14:29 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांकडे बहुमताची मागणी हाच पर्याय होता – कौल
अनेक आमदारांनी पाठिंबा काढून घेतला होता, मंत्रालयातही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं होतं की त्यांचा सरकारवर विश्वास राहिला नाही. विधिमंडळ पक्षातल्या मोठ्या गटानं सरकारचा पाठिंबा काढला होता. या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगणं हाच एकमेव मार्ग शिल्लक होता – नीरज कौल
14:26 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या वकिलांकडून बोम्मई प्रकरणाचा दिला दाखला
बोम्मई प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं होतं की अशा प्रकरणात बहुमत चाचणी हाच एकमेव मार्ग असू शकेल. तोच पर्याय राज्यपालांनी निवडला – नीरज कौल
14:25 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: युक्तिवाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध होता – कौल
न्यायालयासमोर करण्यात आलेला युक्तिवाद हा राज्यघटनेच्या तत्वानुसार बोम्मई आणि शिवराजसिंह चौहान प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालांच्या विरुद्ध होता – कौल
14:18 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: नीरज कौल यांच्या युक्तिवादाला सुरुवात
वरीष्ठ वकील नीरज कौल यांनी शिंदे गटाच्या वतीने बाजू मांडण्यास सुरुवात केली
14:12 (IST) 28 Feb 2023
उद्धवजी, २०२४नंतर तुमच्या किंचित सेनेचं काय होईल, हे… – चंद्रशेखर बावनकुळे
” तुम्ही विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला तरी २०२४ च्या निवडणुकीत मोदीजींच्या नेतृत्वात भाजपला ऐतिहासिक विजय मिळेल. “
13:59 (IST) 28 Feb 2023
शिंदे गटाने बजावलेल्या व्हीपचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात; ठाकरे गटाचे वकील म्हणाले, “आपण बोलत असतानाही तिकडे…”
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान आम्ही कोणताही व्हीप बजावणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाकडून देण्यात आले होते. मात्र, तरीही विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच, शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिंदे गटाकडून व्हीप बजावण्यात आला. दरम्यान, हा मुद्दा आज ठाकरे गटाच्यावतीने सर्वोच न्यायालयात उपस्थित करण्यात आला.
13:04 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपणार!
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असून येत्या गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडतील. गुरुवारी दुपारी दोनपर्यंत सॉलिसिटर जनरल हरिष साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील तर त्यानंतर शेवटचे दोन तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील रिजॉइंडरसाठी बाजू मांडतील.
12:56 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला
ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि कामत यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेकसाठी कोर्टाचं कामकाज थांबलं आहे. लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून वरीष्ठ वकील नीरज के. कौल युक्तिवादाला सुरुवात करतील.
12:48 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: काम यांनी दहाव्या परिशिष्टाचा दिला दाखला…
जेव्हा एखादा पक्षांतर्गत वाद निर्माण होतो, तेव्हा एखादा आमदार अशी भूमिका घेऊ शकतो का की आता मी राजकीय पक्ष आहे आणि मी दहाव्या परिशिष्टामध्ये बंधनं घातलेल्या पद्धतीने व्यवहार करू शकतो? – कामत
12:47 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: राजकीय पक्ष याचा अर्थ नेतृत्वाकडून आलेले निर्देश असा होतो – कामत
राजकीय पक्ष हे काही नियमबाह्य पद्धतीने काम करत नाहीत. पक्षांमध्ये कोण सदस्य आहेत, कोण प्रमुख आहे, पक्षाची रचना काय आहे हे सगळं स्पष्ट असतं. त्यामुळे जेव्हा दहाव्या परिशिष्टामध्ये राजकीय पक्षाचे निर्देश असा उल्लेख असतो, तेव्हा त्याचा अर्थ संबंधित पक्षाच्या नेतृत्वाकडून आलेले निर्देश असा होतो – कामत
12:42 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: राजकीय पक्षांचे निर्णय त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जाहीर होतात – कामत
राजकीय पक्ष म्हणजे काय? कोणत्याही राजकीय पक्षाचे निर्णय हे त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून जाहीर केले जातात – कामत
12:39 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: Whip ची नियुक्ती करणं हे संसदीय काम नाही – कामत
प्रतोद (Whip) नियुक्त करणं हे संसदीय प्रणालीतलं काम नाही. मुळात हे सगळं प्रकरण प्रक्रियेमधील गैरव्यवहाराचं नसून प्रत्यक्ष राज्यघटनेच्या उल्लंघनाचं आहे – कामत यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
12:32 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: भरत गोगावलेंनी पाठवलेलं पत्र पक्षाचं नव्हतं – कामत
भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना ३ जुलै रोजी पाठवलेलं पत्र राजकीय पक्ष म्हणून पाठवलं नव्हतं. त्या पत्राच्या शेवटी ‘शिवसेना विधिमंडळ पक्ष’ असा उल्लेख होता. त्यामुळे प्रतोदची निवड राजकीय पक्ष करू शकतो की विधिमंडळ गट हा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो – देवदत्त कामत
12:29 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या पत्राचा कामतांनी दिला दाखला…
एकनाथ शिंदेंच्या एका पत्राच्या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती झाल्याच्या निर्णयाला मान्यता दिली – देवदत्त कामत
12:28 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: देवदत्त कामतांनी भरत गोगावलेंचं पत्र वाचून दाखवलं
३ जुलैला विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना पत्र पाठवून त्यांना प्रतोदपदावरून काढल्याची माहिती दिली. तसेच, विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षनेतापदी नियुक्ती झाल्याची माहिती या पत्रात दिली – देवदत्त कामत
12:22 (IST) 28 Feb 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांना कशाच्या आधारावर फुटीर आमदारांना गट म्हणून मान्यता दिली? – कपिल सिब्बल
दहाव्या परिशिष्टाच्या तिसऱ्या परिच्छेदात म्हटलंय की अशा परिस्थितीत मूळ पक्षामध्ये फूट पडायला हवी. पण जर राज्यपालांना तेव्हा हे माहिती होतं की मूळ पक्षात कोणतीही फूट नाही, तरीही ते त्या आमदारांना नवा गट म्हणून मान्यता कशी देऊ शकतात? हा निर्णय वैयक्तिक पातळीवर घेतला गेला. तो बहुमताच्या आधारावर घेतला जायता हवा होता.
12:19 (IST) 28 Feb 2023
अभिषेक मनू सिंघवींचा युक्तिवाद संपला
अभिषेक मनू सिंगवींचा युक्तिवाद संपला असून आता सर्वोच्च न्यायालयात देवदत्त कामत ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत.
12:15 (IST) 28 Feb 2023
सरन्यायाधीशांचे सिंघवींना सवाल…
सरकार अल्पमतात असल्याचं समजूनही राज्यपाल त्यावर काहीच करू शकत नाही का? राज्यपाल स्वत:हून त्यावर निर्णय घेऊ शकत नाहीत का? – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड
12:09 (IST) 28 Feb 2023
राज्यपालांना अविश्वास ठरावाबाबत कोणते अधिकार असतात? – सर्वोच्च न्यायालय
सरकार सत्तेत असताना राज्यपालांना अविश्वास ठरावासंदर्भात कोणते अधिकार असतात? सर्वोच्च न्यायालयाची अभिषेक मनू सिंघवींना विचारणा..
सिंघवी म्हणतात, जर अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित असेल, तर राज्यपालांना कोणतेही अधिकार नाहीत!
12:05 (IST) 28 Feb 2023
आपण बोलत असतानाही तिकडे व्हीप बजावला जातोय – सिंघवी
अंतरिम आदेशांमुळे मागे उरलेल्या आमदारांना संरक्षण राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी विलीन न होताही मागे उरलेले आमदार व्हीपसाठी जबाबदार ठरले आहेत – सिंघवी
12:02 (IST) 28 Feb 2023
विलीन न होताच व्हीप बजावले जातायत – सिंघवी
जर काही आमदार दुसऱ्या पक्षात गेले, तर उरलेल्या आमदारांना दहाव्या परिशिष्टाचं संरक्षण असतं. पण या प्रकरणात उरलेल्या आमदारांना संरक्षण नाहीये. बंडखोर आमदार दुसऱ्या पक्षात विलीन न होताही उरलेल्या आमदारांना व्हीप बजावले जात आहेत. – अभिषेक मनू सिंघवी
12:00 (IST) 28 Feb 2023
सुप्रीम कोर्टातील सुनावणी १०व्या परिशिष्टावर अवलंबून; हे दहावं परिशिष्ट आहे तरी काय?
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत वारंवार समोर आलेल्या दहाव्या परिशिष्टात नेमकं आहे तरी काय?
11:57 (IST) 28 Feb 2023
अभिषेक मनू सिंघवींच्या युक्तीवादावर न्यायाधीशांमध्ये चर्चा
अभिषेक मनू सिंघवींनी राज्यपालांची भूमिका, आमदारांची अपात्रता. पक्षांतरबंदी कायदा आणि दहाव्या परिशिष्टाचा दाखला दिल्यानंतर त्यावर पाचही न्यायाधीशांमध्ये चर्चा सुरू…
11:53 (IST) 28 Feb 2023
दहाव्या परिशिष्टातील तरतुदींचा गैरवापर – सिंघवी
राज्यपालांकडून दहाव्या परिशिष्टातील सूचींचा गैरवापर करण्यात आल्याचा दावा अभिषेक मनू सिंघवींनी न्यायालयात केला आहे.
11:51 (IST) 28 Feb 2023
आमदार अपात्र ठरले तर पुन्हा निवडणूक – सिंघवी
आमदार जर अपात्र ठरले, तर त्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढवावी लागते. यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. पण आमदार अपात्र झाले, तर मंत्रीपदाची शपथ घेता येत नाही – अभिषेक मनू सिंघवी
11:48 (IST) 28 Feb 2023
२७ जूनपूर्वीची परिस्थिती पुन्हा लागू करावी – सिंघवी
राज्यपालांचा पत्रव्यवहार रद्द ठरवल्यास २७ जूनपूर्वीची परिस्थिती पुन्हा लागू होईल. – अभिषेक मनू सिंघवी
11:39 (IST) 28 Feb 2023
राज्यपालांचा पत्रव्यवहार रद्द करा – अभिषेक मनू सिंघवी
राज्यपालांनी सत्तास्थापनेवेळी केलेला पत्रव्यवहार आणि त्यातील संदर्भ रद्द करण्याची मागणी अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यामुळे पूर्वलक्ष्यी परिस्थिती जैसे थे होईल आणि त्यावर निर्णय घेता येईल.
11:38 (IST) 28 Feb 2023
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्र कसं लिहिलं?
राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून ठाकरे गट खरी शिवसेना नसून शिंदे गट खरी शिवसेना असल्याचे संकेत दिले – अभिषेक मनू सिंघवी
अभिषेक मनू सिंघवींचे महत्त्वाचे मुद्दे…
१. तुम्ही विधानसभा अध्यक्षांना इतक्या सहज अपात्र ठरवू शकता का?
२. राज्यपालांच्या निर्णयामुळे फक्त सरकार बदललं नाही, तर ते संबंधितांच्या कार्यक्षेत्राचंही उल्लंघन आहे. फक्त सर्वोच्च न्यायालय या प्रकारे निर्णय घेऊ शकतं.
३. राज्यपालांनी बहुमत चाचणी संदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपाल अशा प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाहीत. राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असले, तरी ते कार्यकारी पद्धतीने नियुक्त झालेले आहेत.
४. राज्यपालांनी शिवसेनेतील फुटीला मंजुरी दिली. सर्वोच्च न्यायालय हे करू शकत नसताना राज्यपाल कसं करू शकतात? घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांनी ही चूक केली आहे.
11:24 (IST) 28 Feb 2023
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनू सिंघवींनी अपूर्ण राहिलेल्या युक्तिवादाला सुरुवात केली आहे. या सर्व प्रकरणाच्या पाच परिणामांचा उल्लेक मनू सिंघवी यांनी केला…