बीड (रिपोर्टर) सामाजिक समतेचे महानायक, दलित समाजाला माणसाचा दर्जा मिळवून देणारे भारतीय जनतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132 व्या जयंतीच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हजारो बांधवांनी अभिवादन केले. या वेळी प्रामुख्याने बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.
गेल्या 1 एप्रिलपासून बीड शहरामध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने जयभीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक मान्यवरांची व्याख्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर एकांकीका आदी कार्यक्रमांचा यामध्ये समावेश होता. डॉ. आंबेडकर यांच्यामुळे ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ अशा जल्लोषपुर्ण वातावरणात गेले सात दिवस सामाजिक न्यायभवन या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काल रात्री बारा वाजता समता सैनिक दलाच्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने समता ज्योत मशाल रॅली शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आरंभ करत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. आज सकाळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भिक्कु धम्मशील यांच्या पंचशील आणि त्रिशरण सामुहिक वंदना घेण्यात आली. त्रिशरण आणि वंदनेनंतर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यास सुरुवात झाली. आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील, अप्पर जिल्हाधिकारी तथा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जगदाळे, सहायक आयुक्त सामाजिक विभाग रविंद्र शिंदे, तहसीलदार सुहास हजारे, सामाजिक मान्यवरांमध्ये रविंद्र दळवी, जयदीप सवाई, अजिंक्य चांदणे, सर्जेराव तांदळे, जोगदंड सर, मनिषा तोकले, अशोक तांगडे, सी.ए. जाधव, अॅड. राहूल मस्के, जयदीप सवाई, अरुण आठवले, गोविंद साठे, सुशिलाताई मोराळे यांच्यासह समाजातील मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.