बीड (रिपोर्टर) ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा वापर स्वार्थासाठी करणारे आप्पासाहेब जाधव यांनी काल थेट शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना चापटा मारल्याचा दावा केला. या दाव्याने राज्यभरात खळबळ उडवून दिली असता आज ठाकरेंच्या शिवसेनेने तडकाफडकी निर्णय घेत आप्पासाहेब जाधव यांच्यासह शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडु पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली. उद्या बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची प्रबोधन यात्रा आहे. त्या कार्यक्रमाला गालबोट लागण्या हेतू शिंदे गटाने असे कृत्य घडवून आणल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे तर आप्पा जाधव यांनी केलेल्या खोट्या दाव्याची सर्वत्र छी…थू… होताना दिसून येत आहे. आप्पा जाधव हे सातत्याने वादग्रस्त राहिले आहेत. शिवसेना पक्ष वाढवण्यापेक्षा पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर स्वत:चे अर्थार्जन वाढवण्यात आप्पा जाधव मश्गुल होते, असे अनेकांचे म्हणणे आहे.
20 मे रोजी बीडमध्ये शिवसेना नेते खा. संजय राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बुलंद तोफ सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत प्रबोधन यात्रेनिमित्त जाहीर सभा होत आहे. त्या सभेचे नियोजीत स्थळ पाहण्यासाठी काल सुषमा अंधारे या माने कॉम्प्लेक्स परिसरात होत्या. त्या दरम्यान आप्पा जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात वाद झाला. हाणामारीही झाली. गणेश रेकर व त्यांच्या समर्थकांनी आप्पा जाधव यांना प्रचंड मारहाण केली, गाडीची तोडफोड केली, त्या वेळी आप्पा जाधव घटनास्थळावरून पळून गेले. आपल्या बदमुर्ख वर्तनाचे पक्षाकडून गंभीरतेने घेतले जाईल, हे लक्षात येताच आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ काढून आपण थेट सुषमा अंधारे यांना दोन चापटा मारल्या, असा दावा करत अंधारे पद देण्यासाठी पैसे मागतात, असा खोटा आरोपही केला. त्यामुळे राज्यभरात या घटनेचे राजकीय पडसाद उमटले आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसून आल्या. ठाकरे गटाच्या शिवसेनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मुखपत्र असलेल्या सामनामधून आप्पासाहेब जाधव यांची शिवसेनेतून तडकाफडकी हकालपट्टी केली. त्यांच्या सोबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनाही घरचा रस्ता दाखवला. आप्पासाहेब जाधव यांचे बोलविते धनी शिंदे गट असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला.
आप्पा, महिलेला मारल्याचा दावा
करणे हे मर्दाचे लक्षण आहे का?
खरंतर ही चौकट करताना हसू येतं. स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणवून घेणारे आप्पा जाधव यांनी काल महिला असलेल्या सुषमा अंधारेंना दोन चापटा मारल्याचा दावा केला. आम्हाला प्रश्न पडला, महिलांवर हात उचलणे हे महाराष्ट्रात केव्हापासून
मर्दाचे लक्षण झाले.
सुक्ष्म समाजातल्या
अंधारेंची सह्याद्रीला गवसणी
छत्रपती शिवाजी महाराजांसह शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा सोबत घेऊन सुरुवातीपासून समाजप्रबोधन करणार्या सुषमा अंधारे या अत्यंत छोट्या समाजातून आहेत. परंतु अखंड महाराष्ट्राला नव्हे नव्हे तर सह्याद्रीला गवसणी घालणारी विचाराची पेरणी त्या सातत्याने करत आल्या आहेत. अशा स्थितीत सुषमा अंधारे यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणे हे निर्लज्जतेचे लक्षण आहे. जी व्यक्ती महाराजांसह शाहू-फुले -आंबेडकरांच्या विचारधारेवर चालते महिला असून सातत्याने अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. अशा महिलेविरुद्ध खोटेनाटे आरोप करणे आणि मारहाण केल्याचा दावा करणे हे षंडपणाचे लक्षण असल्याची जळजळीत प्रतिक्रिया सर्वसामान्यातून येत आहे.