मराठा आरक्षणासाठी शहागडच्या एकनाथ चौकात मराठ्यांचा तळ
औरंगाबाद-जालना व गेवराई तालुक्यातल्या गोदाकाठच्या शेकडो गावचे अबालवृद्ध आंदोलनात
गेवराई/शहागड (भागवत जाधव)- भीक नाही, हक्क मागतोय, कुणबी आणि मराठा एकच आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे म्हणत बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या शंभर गावांपेक्षा अधिक गावातील समाज बांधवांसह जालना-औरंगाबाद जिल्ह्यातील मराठा समाजाने आज शहागडच्या संत एकनाथ चौकात जनआक्रोश आंदोलन सुरू करत सकाळी दहा वाजल्यापासून धुळे-सोलापूर महामार्ग बंद पाडला. या आंदोलनासाठी शेकडो गावातील अबालवृद्धांनी बैलगाडी, ट्रॅक्टर मिळेल त्या वाहनाने आंदोलनस्थळी येऊन ओबीसीतूनच मराठा समाजाा 50 टक्केच्या आतच आरक्षण द्या, कोपर्डीच्या आरोपींना तात्काळ फाशी द्या, अशी मागणी करत आजच्या आज निर्णय न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाा पुन्हा एकदा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला. या आंदोलनामुळे महामार्गावर 10 कि.मी. पेक्षा जास्त वाहनांच्या रांगा पहावयास मिळत आहेत तर पर्यायी रस्ता म्हणून उमापूर-शेवगाव-पैठण ते औरंगाबाद असे वाहनांना वळवण्यात आल्याची माहिती हाती येत आहे.
मराठा समाजाला ओबीसीतूनच 50 टक्क्यातच आरक्षण द्या या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शहागडच्या संत एकनाथ चौकात जनआक्रोश आंदोलन उभे राहिले आहे. ‘भीक नाही, हक्क मागतोय, कुणबी आणि मराठा एकच आहेत’, असं म्हणत मराठा रस्त्यावर उतरले. गेवराई तालुक्यातील गोदाकाठातून शंभरपेक्षा अधिक गावातील नागरीकांनी, महिलांनी मिळेल त्या वाहनांनी आंदोलनस्थळी जाणे पसंत केले. काही नागरीक गोदाकाठातून बैलगाडीने आंदोलनस्थळी पोहचले. सकाळी दहा वाजल्यापासून धुळे-सोलापूर महामार्ग बंद पाडण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणार्या वाहनांची तब्बल 10 कि.मी. एवढ्या मोठमोठ्या रांगा दोन्ही बाजुने लागल्या आहेत. बीडकडून औरंगाबाद-जालन्यासाठी जाणार्या वाहनांसाठी उमापूर मार्गे शेवगाव-पैठण मार्गे औरंगाबाद असा पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज आंदोलनस्थळी तळ ठोकून असून आजचे आजच मराठा समाजाला आरक्षण द्या, म्हणत आंदोलकांनी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भामध्ये कुणबी समाजाला ज्या सवलती आहेत त्या धर्तीवर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी मराठाच्या सवलती लागू करा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. या रास्ता रोको आंदोलनामध्ये महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगण्यात येते.
दहा वाजल्यापासून रास्ता रोकोने
धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प
प्रचंड रहदरीचा असलेला धुळे-सोलापूर महामार्ग गेल्या चार तासांपासून ठप्प झाला आहे. शहागड जवळच्या एकनात चौकात हजारो मराठे तळ ठोकून बसल्याने वाहतूक पुर्णत: ठप्प झाल्याचे पहावयास मिळते.
आजच्या आज निर्णय घ्या नसता पुन्हा आमरण उपोषण -मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दशकभरापासून निकराची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आज आंदोलन होत असून आजचे आज शासनाने मराठा समाजाबाबत निर्णय घेतला नाही तर लगेच सराटे अंतरवली येथे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले. याआधी जरांगे यांनी पंधरा ते वीस दिवसांचे अनेक वेळा आमरण उपोषण, आंदोलन केेलेले आहे.