आ.संदीप क्षीरसागर यांची सरकारकडे मागणी
बीड (रिपोर्टर)ः- बीड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या एका महिन्यापासून शेतीला पूरक एकही पाऊस झाला नाही. पावसाअभावी शेतातील पिके अक्षरशः करपून नष्ट होत आहेत. सद्यस्थितीला मान्सूनचा अर्ध्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. आत्तापर्यंत तर पाऊस झालाच नाही, परंतु यापुढेही होईल अशी शक्यता दिसत नाही. तसेच शंखी गोगलगाय, लंपी आजार अशा सातत्याने आलेल्या संकटांमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वारंवार काहीतरी अडचण शेती व्यवसायापुढे येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्यसरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
पेरणीच्या काळात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परंतु उशीर होऊ नये याकरिता शेतकर्यांनी पेरण्या करून घेतल्या. पण पूर्ण मान्सूनचा काळ लोटत आला तरीदेखील शेतीसाठी पूरक अशा प्रकारचा एकही पाऊस जिल्ह्यात झाला नाही. पीके करपून नष्ट होत आहेत. पेरणीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. शेतकर्यांपुढे खूप मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे कोरडा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे राज्यसरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून अग्रीम पिकविमा मंजूर करून तातडीने वितरित करावा. खरीप हंगामातील शेतकर्यांचे पीक कर्ज सर्वरित्या माफ करावे. तसेच 2020 जाहीर करण्यात आलेला पीक विमा अद्यापपर्यंतही जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळालेला नाही. बीड मतदार संघातील काही महसुल मंडळात शेतकर्यांच्या पीकांचे पुर्णत: नुकसान होवून देखिल त्यांना
लाभ मिळू शकला नाही.
जिल्ह्यातील अनेक महसुल मंडळात पर्जन्यमापक यंत्र व यंत्रणा नसल्याने पावसाची नोंदी कोणत्या आधारे ठरवण्यात येते? गत महिन्यापासून पावसाने उघडीप दिली असून शेतकर्यांना पीक विम्याचा लाभ होणेसाठी जिल्हा प्रशासनस्तरावरून चालू स्थितीतील पिकांचा रँडम सर्व्हे करण्यात यावा. तसेच पावसाची आजपर्यंतची स्थिती पाहता बीड जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटातून धीर देणेसाठी आवर्षनग्रस्त शेतकर्यांना दिलासा देणेसाठी ठोस उपाय योजना करण्यात याव्यात अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्य सरकारला केली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार केला आहे.