राज्याच्या राजकरणावर कायम वर्चस्व ठेवलेले बीडच्या राजकारणातले थोरले घर म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची राज्याच्या राजकारणावर आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणासह समाजकारणावर थ्री फेज पकड होती. विकासात्मक दृष्टीकोनातून बीडच्या कुठल्याही कोपर्यात विकासाचा प्रकाश पाडायचा असेल तर क्षीरसागर कुटुंबियांच्या थ्री फेज शिवाय पर्याय नव्हता. स्व. केशरकाकुंच्या राजकीय वारश्यातून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नगरपालिकेचे माजी अध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर आणि गजानन सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रवींद्र क्षीरसागर या तिघांनी तो थ्री फेज प्रकाश एक नव्हे दोन नव्हे तब्बल चार ते पाच दशके बीड आणि जिल्ह्यात पाडला. मात्र संवादाचा आभाव म्हणा, अथवा राजकीय महत्वाकांक्षाची हाव म्हणा, राजकारणातल्या या थोरल्या घरात एकतेच्या विद्युत प्रवाहाचे एक एक फेजच्या तारा तुटत गेल्या. एकतेच्या बंधनात कुठे शॉर्टसर्किट झाले, त्या शॉर्टसर्किटचे प्रॉब्लेम थोरले असणारे क्षीरसागरांना समजलेच नाही. सरशेवटी थ्री फेजचा लख्ख प्रकाश सिंगल फेजवर आला, अन् जयदत्त क्षीरसागरांना कन्फ्युज करून गेला.
क्षीरसागरांच्या घरातले थोरले म्हणून जिल्ह्यावर जसा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा एकअंगी वकुब होता तसा गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी आपल्या घरावरही एकअंगी वकुब होता. मात्र ज्या वेळेस महत्वाकांक्षा वाढते, प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी वाटते तेव्हाच एकतर पितृत्वाने आणि दातृत्वाने भविष्याचा वेध घेऊ पाहणार्या घरातल्या व्यक्तींचे पावले ओळखायला हवेत, नसता स्वातंत्र्याचा सौराचार होणार नाही याची दखल घ्यायला हवी. मात्र इथे तसे झाले नाही. गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी क्षीरसागरांचे धाकले बंधू रवींद्र क्षीरसागर यांचे पुत्र संदीप क्षीरसागरांनी मधव्या काकांवर नाराज होत बंडाचे निशान फडकवले. त्यावेळी हे बंड शमेल, असे वाटत होते मात्र नगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीत थेट थोरल्या काकांनाच आव्हान देत संदीप क्षीरसागरांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना चितपट केले, तिथे आता घर फुटले हे स्पष्ट झाले. तेव्हा नगरपालिकेचे कायम अध्यक्षपद भूषविणारे डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र डॉ. योगेश क्षीरसागर यांना राजकारणामध्ये लाँच करण्यात आले आणि दोन काकांविरुद्ध संदीप क्षीरसागर असा सामना पहायला मिळाला. कित्येक वर्ष राष्ट्रवादीमध्ये आणि काँग्रेसी विचारसरणीच्या प्रवाहात असणारे माजी मंत्री क्षीरसागर यांना कधी नव्हे ते स्वत:च्या गळ्यात भगवा गमजा टाकावा लागला आणि ते शिवसेनेत डेरेदाखल झाले. मात्र विचाराची परतारना बाह्य रुपातून होत असली तरी आंतरभावनेतून ती रुजत नसल्याने क्षीरसागरांना जास्त काळ गळ्यामध्ये भगवा ठेवता आला नाही.
राष्ट्रवादी सोडल्यानंतर शिवसेनेतही अस्वस्थ असलेले जयदत्त क्षीरसागर भाजपाचे महाराष्ट्राचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक जवळ जात गेले आणि तिथेच शिवसेनेनेही जयदत्त क्षीरसागरांना पक्षातून बाहेर काढले. खरंतर क्षीरसागरांची हकालपट्टी ही जयदत्त क्षीरसागरांची राजकीय इमेज डॅमेज करणारीच. एकतर घरातून सातत्याने विरोध त्यात राजकीय अनिश्चितता या चक्रव्यूहात थोरले क्षीरसागर अडकले. या वर्ष दीड वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यांतरे घडली, शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि
भाजपाच्या काफिल्यात जावून या दोन्ही पक्षांचे गट स्थीरावले. अशावेळी जयदत्त क्षीरसागरांनी कुठलीच भूमिका कार्यकर्त्यांसमोर अथवा आपल्या घरातल्या अन्य सदस्यांसोबत मांडली नाही. ज्याप्रमाणे संदीप क्षीरसागरांनी भविष्याचा वेध घेतला आणि आपला मार्ग निवडला त्याप्रमाणे जयदत्त क्षीरसागरांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागरांनीही भविष्याचा वेध घेतल्याचे सांगत आपला मार्ग निवडला, वाट शोधली अन् जयदत्त क्षीरसागरांना सोडून थेट अजित पवारांचं आणि धनंजय मुंडेंचं नेतृत्व स्वीकारलं. थ्री फेजवर असलेले जयदत्त क्षीरसागरांचा एक एक फेज उडत गेला. आज ते सिंगल फेजवर आहेत. अशा स्थितीतही जयदत्त क्षीरसागरांनी अद्याप कुठलाही पक्ष अथवा पक्षीय विचारधारा स्पष्ट केली नसली तरी गेल्या महिनाभराच्या कालखंडात ते चांगलेच हरकतमध्ये आले, बैठका सुरू केाल्या. ईट जवळच्या गजानन सुत गिरणीवर त्यांनी एक बँकेची बैठक घेतली, खरी तर ती कार्यकर्त्यांचीच बैठक होती, या बैठकीला बर्यापैकी लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे अजित पवारांची सभा ज्या दिवशी होती त्याच दिवशी ती बैठक होती. या बैठकीमध्ये बर्याच गोष्टींवर चर्चा झाली, प्रतिक्रिया व्यक्त केल्या, परंतु बैठकीत खासकरून जयदत्त क्षीरसागरांनी आपला सिंगल फेज आणि फेस (चेहरा) लोकांसमोर आणला. आतापर्यंत राजकारणामध्ये पुतण्याला प्रोटेक्ट करणारे क्षीरसागर यांनी प्रथमच राजकीय व्यासपीठावर आपले ज्येष्ठ चिरंजीव रोहीत क्षीरसागर यांना आणणे पसंत केले. मात्र रोहीत क्षीरसागर आणि राजकारणाशी दूरदूरचा संबध नसलेल्या रोहीत यास आपल्या दोन बंधुंना शह देण्यासाठी मोठी मोट बांधावी लागेल. आता जयदत्त क्षीरसागर बैठका घेत असल्याने लवकरच ते महत्वाचा निर्णय घेतील, अशी आशा आहे.
एकीकडे त्यांच्यासाठी भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पर्याय आहेत, समजा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले तर ते खासदारकीचे उमेदवार म्हणून संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जुळवून घेऊ शकतात, परंतु बीड जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा आणि लाखाच्या मताधिक्यातला असल्याने ते सहसा अवघड असल्याचे एकीकडे दिसतं. एक विचारधारा, जातीय समीकरण जुळविण्यासाठी आणि मतांचे ध्रुवीकरण करून विजयाच्या उंबरठ्यापर्यंत जाण्यासाठी काँग्रेस हा एक त्यांचा मार्ग असू शकतो. सध्या तरी क्षीरसागर हे कन्फ्यूज असल्याचे त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून बोलले जाते. मात्र आतापर्यंतचा राजकीय प्रवास आणि त्या प्रवासातला अनुभव यावर क्षीरसागर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.