गणेश सावंत
हा पक्ष माझ्या बापाचा आहे, मी का पक्ष सोडून जाऊ, माझे नेते मोदी आणि शहा आहेत. मी पक्षाला कधीही काही मागणार नाही. मंत्रीपदासाठी मी काम करत नाही, मी तुमच्यासाठी काम करते. पक्ष थोडाच माझा आहे, असे एक ना अनेक थेट आणि स्पष्ट वक्तव्ये करत पंकजा मुंडे भाजपात अस्वस्थ असल्याबाबतचे अनेक वेळा संकेत आले, अन् पंकजा मुंडे पक्ष सोडणार यावर चर्चा सुरू झाल्या. त्याचवेळी अचानक पंकजा यांनी आपण दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे सांगून पंकजा नेमक्या काय निर्णय घेणार यावर महाराष्ट्रभर रवंथ सुरू झाला तेव्हा व्यवहारीक जीवनाला अधिक सुंदर बनविण्या हेतू आत्मचिंतीत होत साधना ही महत्वाची असते, स्वत:ला जाणवलेल्या न्यूनतेला भरून काढण्याचा प्रयत्नही अध्यात्मातून केला जातो. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. ती अर्जुनाने एकरुप होत ऐकली, म्हणून अर्जुनाला आप्तस्वकियांवर विजय प्राप्त करता आला. तीच अर्जुनाची योग्यता अंगीकारण्यासाठी पंकजांनी दोन महिन्याची सुट्टी घेतली नसेल ना, पंकजा यांनी या दोन महिन्यांच्या कालखंडात आपल्या हातातला व्यवहारीक राजकीय प्रगतीचा गांडीव धनुष्य टाकून तर दिला नसेल ना आणि या धनुष्याची सुधारीत आवृत्ती मिळविण्यासाठी पंकजांची उद्याची शिवशक्ती यात्रा तर नाही ना असे एक ना अनेक प्रश्न आजघडीला नक्कीच पडणार.
पंकजा गोपीनाथ मुंडे हे नाव महाराष्ट्रासाठी नवे नाही. संघर्षशील नेत्याची संघर्षशील कन्या म्हणून पंकजांकडे पाहिले जाते. पंकजांचा तोच रुबाब जेव्हा महाराष्ट्रभर राबता राहत असल्याचे पाहून गेल्या पाच-सात वर्षांपूर्वीच पंकजांचा रुबाब कमी करण्या हेतू पक्षीय स्वकियांकडून त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला गेला. आदीशक्ती होत असलेल्या पंकजांच्या पाठिशी जनशक्ती दांडगी असल्याचे पाहून पक्षातीलच विरोधकांना हेवा वाटणे साहजिक. मात्र त्या जनशक्तीच्या आणि आपण आदीशक्ती असल्याचा आभास जेव्हा पंकजांना झाला आणि त्यांच्याकडून ताठरता आणि अहंकाराला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले तेच विरोधकांचे यशस्वी फलीत ठरले आणि पंकजा या कती अहंकारी आहेत याचा प्रचार अधिक अधिक प्रमाणात करण्यात आला. तिथेच पंकजा आणि भाजपात अंतर्गत तेढ होत राहिली. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांपासून सुरू झालेला हा शिवनापाणीचा खेळ पंकजांना एकटंच नव्हे तर अडगळीला पाडण्यापर्यंत गेला. त्यामुळे गेल्या पाच-सात वर्षांच्या कालखंडामध्ये पंकजांनी भगवान गडाच्या पायथ्यापासून गोपीनाथ गडाच्या शिखरापर्यंत पक्षातील काही लोकांच्या कार्यप्रणालीबाबत आग ओकण्यास सुरुवात केली. कुणाला वाटत असेल मी पक्ष सोडावा, मी पक्ष सोडणार नाही, हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असे ठामपणे पंकजांनी सांगितले आणि तेही खरे. भाजप जेव्हा महाराष्ट्रामध्ये बॅलाही नव्हती, साधं बेणंही नव्हतं तेव्हा गोपीनाथ मुंडेंनी भाजपाचं बी आणि बेणं महाराष्ट्राच्या मातीत पेरलं, रोवलं, त्याचं संगोपन करून मोठंही केलं, पीक मात्र स्व. मुंडेंना दुर्दैवाने घेता आलं नाही आणि तीच मुंडेंची ताकद जनशक्तीच्या माध्यमातून पंकजांच्या पाठीशी राहिली. परंतु पाच वर्षांच्या कालखंडामध्ये पंकजांनी भ्रमराप्रमाणे काही वेळा राहायला हवं होतं, म्हणजे भ्रमर परागनेती परि कमळदळे नेनती, स्वत:च्या शरीराचा एक अंश सुद्धा फुलाला न टेकता अलगदपणे परागकण घेऊन जातो त्याप्रमाणे पंकजा यांनी स्वत:च्या व्यक्तीमत्वाचा थोडा सुद्धा अंश मनात न ठेवता काम केले असते, तर पंकजांवर आज ही वेळ आली नसती. असो दोन महिन्यांपूर्वी सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेत पंकजांनी आपल्या खांदद्यावरचं राजकीय गांडीव धनुष्य जे खुंटला लटकवून ठेवले होते त्याचे अपडेट व्हर्जन त्या शिवशक्ती महाराष्ट्र दर्शनावरून पुन्हा एकदा आपल्या खांद्यावर घेतील. 4 सप्टेंबरपासून पंकजा मुंडेंचे महाराष्ट्रातील शिवालयांमध्ये नतमस्तकी स्वरुप उभा महाराष्ट्र पाहिल परंतु या कालावधीत महाराष्ट्रातील मुंडे अनुयायी आणि समर्थकांसोबत घेतलेल्या भेटीनंतर पंकजांचे महाराष्ट्रातले तांडव हे पक्षातील स्वकियांना फटके देणारे ठरेल की त्या तांडवातून भाजपापुढे नवे आव्हान उभे राहील, हे येत्या काही दिवसात दिसून येईल. मात्र गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात भाजपाने विधान परिषदेपासून लोकसभेपर्यंत डावललेच. उलट पंकजांची सामाजीक शक्ती विघटन करण्या हेतू समाजातील अन्य नेत्यांना उमेदवार्याच नव्हे तर मंत्रीपद देऊन बळही देण्यात आले. हे विषय सातत्याने मांडण्यात आले, लिहिण्यात आले, मात्र गेल्या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये पंकजांनी जी सुट्टी घेतली आणि त्या सुट्टीमध्ये पंकजा कधी देवपुजा करताना, कधी जप करताना, कधी साधना करतानाचे व्हिडिओ बाहेर आले तेव्हा पंकजा यांनी या दोन महिन्यांच्या कालखंडामध्ये आपल्या भविष्याची रणनीती नक्कीच आखली. यावर दुमत असण्याचे कारण नाही. आता पंकजांची उद्याची शिवशक्ती यात्रा महाराष्ट्राला काय देते, मुंडेंच्या अनुयायांसह समर्थकांना कुठे घेऊन जाते आणि आपल्याच तंदरीत असलेल्या भाजपाला या शिवशक्ती यात्रेतून कुठला ‘प्रसाद’ मिळतो हे पाहण्यासारखे राहील.