भुजबळांचे ते भाषण फडणवीसांच्या स्क्रिप्टवर
बीड (रिपोर्टर): बीडमध्ये झालेल्या जाळपोळीसह दंगलीला सरकारमधील एक व्यक्ती जवाबदार असल्याचा गौप्यस्फोट करत राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहीत पवार यांनी अंबडमध्ये छगन भुजबळांची जी सभा झाली त्या सभेत भुजबळांनी जे भाषण केले ते भाषणही एक स्क्रिप्ट असल्याचे सांगून ती स्क्रिप्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लिहून दिल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. ते बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवा नेते तथा आ. रोहीत पवार यांची 4 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. ती यात्रा बीड जिल्ह्यात डेरेदाखल झाल्यानंतर रात्री मुक्कामी असलेले रोहीत पवार यांनी आज सकाळी पत्रकारांसोबत वार्तालाप केला. त्यावेळी पुढे बोलताना रोहीत पवार म्हणाले की, राज्यामध्ये मराठा, ओबीसी हा वाद मोठ्या राजकीय लोकांमध्ये आहे. यात्रेच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही सामान्य लोकांना भेटतो, बोलतो त्यांचे प्रश्न जाणून घेतो तेव्हा अनेक सामान्य लोकांतून अशा प्रतिक्रिया येतात की, आमचा दुष्काळ निवारणासाठी सरकारने मदत करावी, आमच्या शेतमालाला चांगला भाव द्यावा, आम्ही गावातील लोकं सर्वच जाती समुहाचे गुण्यागोविंदाने राहत आहोत, आमचेच घर दुष्काळाने, नापीकीने जळत असताना आम्हाला मराठा-ओबीसी वादाचे काही देणेघेणे नाही. नुकताच अंबड या ठिकाणी ओबीसी समाजाचा मोठा मेळावा झाला, या मेळाव्यामध्ये ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी हे भाषण केले आहे, त्या भाषणाची स्क्रिप्ट ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना फक्त राजकारण करायचे आहे, भाजपाचे लोकं हुशार असतात, त्यांना ओबीसी समाजालाही दुखवायचे नाही अणि मराठा समाजालाही अंगावर घ्यायचे नाही, अशा पद्धतीची यांची चाल आहे. पुढे रोहीत पवार म्हणाले की, आमची संघर्ष यात्रा ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मस्थळ असलेल्या चोंडी या गावापासून सुरू केली आहे. या यात्रेत आम्ही विद्यार्थी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंब यांच्याशी संवाद साधत आहोत. त्यांचे प्रश्न समजून घेत आहोत. अनेक कुटुंबापुढे विद्यार्थ्यांच्या फि भरण्याचा प्रश्न आवासून असून त्यांचे कुटुंबिय या फिस भरण्याच्या चिंतेत आहेत. या वर्षी मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ पडला आहे. सुरुवातीला सरकारने बीड जिल्ह्यातील फक्त तीन तालुक्यांचा समावेश दुष्काळाच्या यादीमध्ये केला होता. मात्र प्रशासनाकडून प्रत्येक तालुक्याचा रिपोर्ट देताना एकाच वेळी जातो. मग हे तीनच तालुके कसे काय घोषीत केेले? पुन्हा आंदोलन झालं तर उर्वरित तालुक्यांचा समावेश या दुष्काळाच्या यादीत करण्यात आला. या दुष्काळग्रस्तांना राष्ट्रीय आपत्तीच्या निकषाप्रमाणे पाचपट मदत शेतकर्यांना दिली तर थोड्या फार प्रमाणात शेतकर्यांचे दु:ख हलके होईल. दिवाळीच्या पुर्वी शेतकर्यांना पीकविमा देऊ अशी गोड बातमी दिली होती मात्र हा पीकविमा एक-दोन हजार रुपये इतकाच फार कमी शेतकर्यांच्या खात्यात जमा झाला आहे. असे सांगून नगर येथून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी नगर जिल्ह्यातील काही राजकीय मंडळी विरोध करीत आहे, या प्रश्नावर रोहीत पवार यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि येथील शेतकर्यांच्या शाश्वत शेती उत्पन्नासाठी शाश्वत सिंचन योजना सरकारने हाती घ्यावी आणि एका मोठ्या एमआयडीसीची उभारणी बीड जिल्ह्यात निर्माण केली तर बीड जिचल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळेल.