गेवराईकरांची मोठी उपस्थिती, राजेश टोपे, आ. सिरसट, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, आ. लक्ष्मण पवार यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती
संभाजीनगर (रिपोर्टर): ‘पाणी आहे हक्काचे, नाही कोणी रोखायचे’, ‘पाण्यासाठी आमचा लढा दुष्काळात होरपळतोय मराठवाडा’ अशा एकना अनेक घोषणांचे फलक हातात घेऊन मराठवाड्याच्या हिश्श्याला येणार्या हक्काच्या पाण्यासाठी आज सर्वपक्षांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मधील अदालत रोडवर असलेल्या सिंचन भवनासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातल्या अन्य धरणातून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन होते. या आंदोलनामध्ये सर्वाधिक गेवराई तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्तित असल्याचे दिसून आले.
मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली असताना पश्चिम महाराष्ट्रातील धरणातून ज्या पद्धतीने मराठवाड्याच्णया हक्काचे पाणी जायकवाडी धरणात यायला हवे होते ते अद्यापपावेत सोडण्यात आलेले नाही. नाशिक, नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी तात्काळ सोडण्यात यावे या मागणीसाठी आज सर्व पक्षांच्या वतीने संभाजीनगरमध्ये आदोंलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राजेश टोपे, आ. सिरसट, माजी आ. अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, आ. लक्ष्मण पवार,बदामराव पंडित यांच्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी ‘द्या आमच्या हक्काचे पाणी, वागू नका आडमुठ्याउणी’ ‘पाणी आहे हक्काचे नाही कोणी रोखायचे’ यासह अन्य आशयाचे फलक हातात घेतले होते. संभाजीनगरच्या अदालत रोडवर असलेल्या सिंचन भवनासमोर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलक रस्त्यावर बसले. तब्बल दीड तासापेक्षा जास्त वेळ रस्ता रोखून धरल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली. या वेळी मराठवाड्यातून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे या भूमिकेत सरकारला ठणकावून सांगितले.