पात्रुड:(रिपोर्टर)प्रधान मंत्री शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण आहारातील प्रतिविद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 74 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 1 रुपया 12 पैसे वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ 1 मार्चपासून लागू करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.पोषण आहारामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार, तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी 100 ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 150 ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. केंद्र सरकारने 7 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आदेशाद्वारे सन 2022-23 या आर्थिक वर्षातील 1 ऑक्टोबर 2022 पासून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी खर्चाच्या दरात 9.6 टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 15 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चमर्यादा पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 रुपये 45 पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 रुपये 17 पैसे याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती. सद्यस्थितीत केंद्र शासनाने 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याप्रमाणे दरवाढीचे अनुदान दिले जाईल
सुधारित आहार दरानुसार पहिली ते पाचवीच्या विद्याथ्यांसाठी 6 रुपये 11 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 रुपये 29 पैसे दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 3 रुपये 83 पैसे धान्य व अन्य माल पुरविण्यासाठी. तर इंधन आणि भाजीपाला यासाठी 2 रुपये 36 पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी 5 रुपये 75 पैसे खर्च माल पुरवण्यासाठी, इंधन आणि भाजीपाला यासाठी 3 रुपये 54 पैसे याप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणार्या यंत्रणांना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 6 रुपये 19 पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 9 रुपये 29 पैसे याप्रमाणे अनुदान दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.








