केज (बीड) :
विहिरीच्या पाण्यावरून सख्या भावांमध्ये सुरू झालेला किरकोळ वाद थेट रक्तरंजित संघर्षात बदलल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील येवता गावात घडली आहे. या घटनेत कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर झाल्याने दोन्ही बाजूंच्या लोकांना गंभीर जखमा झाल्या असून केज पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीनुसार एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात काम करत असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते व त्याची मुले तेथे आली. “विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस,” असे म्हणत त्यांनी वाद घालून शिवीगाळ केली. यावेळी “पाणी आपण पाळीने (बारीने) घेऊ,” असे मल्हारी यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, रागाच्या भरात अशोक सक्राते यांनी कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात मल्हारी सक्राते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या सक्राते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही प्रतितक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रणव अशोक सक्राते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणव यांच्या हातावर वार करून जखमी केले, तर इतरांनी दगडफेक व मारहाण केली. या तक्रारीनुसारही चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विहिरीच्या पाण्यासारख्या जीवनावश्यक विषयावरून सख्या भावांमध्ये झालेल्या या संघर्षामुळे नातेसंबंध तुटत चालल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असून जमादार हनुमान मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ग्रामीण भागात पाण्याच्या टंचाईमुळे वाद कसे हिंसक वळण घेत आहेत, याचे हे आणखी एक गंभीर उदाहरण मानले जात आहे.









