
दीड लाखाचा मोबाईल व 50 हजारांची रोकड असणारी विसरलेली बॅग भाविकाचा शोध घेऊन केली परत
परळी वैजनाथ (रिपोर्टर): बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात देशाच्या कानाकोपर्यातून भाविक दाखल होत असतात. मंदिर व परिसरात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्यात आलेली आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वतंत्र पोलीस चौकीही नेमण्यात आलेली आहे. या ठिकाणी भाविकांकडून कधी कधी आपले किंमती सामान बॅगा, मोबाईल आदी विसरतात. असाच एक प्रकार आज (दि.4) सकाळी घडला.
मात्र येथील सुरक्षारक्षक व पोलीस चौकीतील पोलीसाने या भाविकाचा शोध घेत बॅग सुपूर्द केली.
आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील महादेवी कोंडारेड्डी हे वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. वैद्यनाथ मंदिरात त्या दर्शनासाठी गेल्या मात्र दर्शन घेऊन गाभार्यातच त्या आपली हॅण्डबॅग विसरून बाहेर आल्या. मंदिर परिसरातून ते निघूनही गेले. दरम्यान या ठिकाणी ड्युटीवर असणार्या वैद्यनाथ मंदिरच्या सुरक्षा सेवेकरीकोंडा कांबळे, प्रियंका सरवदे, यांनी ही हॅण्डबॅग सुरक्षा ऑफिसचे गंगाराम डोणे यांच्याकडे जमा केली. वैद्यनाथ मंदिर पोलिस चौकीचे इंचार्ज स.पो. उपनि. राजाराम शेळके यांनी या भाविकांचा तातडीने शोध घेतला व या भाविकांना सहीसलामत बॅग परत करण्यात आली. विशेष म्हणजे या बॅगमध्ये एक लाख साठ हजार रुपये किंमतीचा अॅपल कंपनीचा मोबाईल, रोख 50 हजार रुपये होते. आपले किंमती सामान असलेली ही बॅग सहीसलामत वापस केल्याबद्दल या भाविक महिलेने सुरक्षा कर्मचारी व मंदिरप्रशासनाचे आभार व्यक्त केले.
भाविकांनी लॉकरचा उपयोग करावा
दरम्यान, मंदिर परिसरात नेहमीच वर्दळ असते. मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात आपल्या बॅगा, मोबाईल व किमती सामान, साहित्य ठेवण्यासाठी लॉकरची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र तरीही काही भाविक लॉकरचा उपयोग न करता मंदिर परिसरात इतरत्र आपले सामान ठेवतात. त्यामुळे अशा घटना घडू शकतात. परंतु भाविकांनी लॉकर च्या सुविधेचा उपयोग करावा व आपले साहित्य बॅगा, सामान लॉकरमध्येच ठेवावे असे आवाहन वैद्यनाथ मंदिर प्रशासनाने केले आहे.








