
मुंबईत मराठ्यांचे हाल तरीही आंदोलनावर ठाम, रस्त्यात शिगडी पेटवली, पोहे बनवले
मुंबई, (रिपोर्टर)ः- मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस गेल्या 48 तासात मराठा आंदोलकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने सहकार्य केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. खाऊ गल्ली, पाणी, बाथरूम बंद करण्यात आल्याने आज मराठा आंदोलकांनी रस्त्यावर आंघोळी केल्या. सकाळचे नाष्टा रस्त्यावर बनविला. त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप पहावयास मिळत आहे. दुसरीकडे मुंबईत आंदोलकांचे हेळसांड पाहून आता अवघ्या महाराष्ट्रभरातून मराठे आंदोलकांची व्यवस्था लावण्यासाठी पुढे सरकत आहेत. बीड जिल्ह्यातूनही आज अनेक ठिकाणावरून बेसन भाकरी, चटणी भाकरी घेवून मुंबईकडे रवाना झाले आहेत. प्रामुख्याने गुंधेवाडी येथील गावकर्यांनी हजारो भाकरी बनवून रात्रीच मुंबईकडे जाणे पसंत केले आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे तर फडणवीस सरकारने आंदोलकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आझाद मैदानावर चिखल झाल्याने आंदोलक मैदानाबाहेर जागा असेल तिथे घोषणाबाजी करतांना आंदोलक दिसून येत आहेत.

महाराष्ट्रात शुक्रवारी मराठा आंदोलनाचा वेगळा टप्पा सुरु झाला. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मुंबईत जरांगे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरूण वर्गही कालपासून मुंबईत आला आहे. पण त्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने प्रशासनावर प्रचंड टीका केली जात आहे. तशातच, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर भाष्य केले. पालिका जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांना त्रास देत आहे. आमचीही वेळ येईल तेव्हा आम्ही तुमचे पाणी बंद करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी मुंबईचे पालिका आयुक्त यांना दिला.
जरांगे पाटील म्हणाले, मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाच्या आवारात असलेल्या मराठा आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवा. तुम्हाला जेवायला मिळू नये, पाणी मिळू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कारण सध्या पालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. आयुक्त साहेब, तुम्हीही सेवानिवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला सुट्टी मिळू देणार नाही. कधी ना कधी बदल होईलच. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. नंतर आमच्या गावात याल तेव्हा सगळा हिशोब केला जाईल, असा इशारा बीएमसी आयुक्तांना जरांगे यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार, आयुक्तांनी आमच्या मराठा आंदोलकांचे पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकाने बंद केली. बीएमसी आणि सीएसएमटीच्या परिसरात जमलेल्या आंदोलकांना विनंती आहे की, हे मुद्दाम केले जात आहे, पण तुम्ही संयम सोडू नका. तुमचे हाल होत आहेत, तर थोडे हाल होऊ द्या. मी पोलिसांना सांगतो की, पोरांना डिवचू नका. विनाकारण ताण देऊ नका. आपलीही वेळ येईल, तेव्हा गोष्टी आपल्याप्रमाणे घडवून आणू, असेही जरांगे म्हणाले.

मनोज जरांगेंच्या मुख्य मागणीवर अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. मराठा आंदोलन चिघळताना दिसत आहे. याचदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणावरुन चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या मुंबई दौर्यावर आहेत. आज अमित शाह यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात जवळपास 1 तास बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांवर देखील अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
ओबीसीमधून मराठा आरक्षण द्या, ही मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीवर एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची सह्याद्री निवासस्थानी चर्चा झाली. प्रामुख्याने ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण द्यायचं असल्यास तर कशा पद्धतीने मध्यथी करत हा प्रश्न सोडवावा, याबाबत अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब;भाजप आमदाराचं स्फोटक वक्तव्य
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरील आमरण उपोषण आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतल्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप आमदार संजय केनेकर यांनी स्फोटक वक्तव्य केलंय. मनोज जरांगे हा शरद पवारांचा सुसाईड बॉम्ब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदार संजय केनेकर म्हणाले की, शरद पवारांचा एक सुसाईड बॉम्ब म्हणून मनोज जरांगेंकडे पाहिले जाते. खर्या अर्थाने हे नुकसान बूमरँग होणार आहे. हा सुसाईड बॉम्ब व्यक्तिगत द्वेषापायी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोडलेला आहे. शरद पवार हे समाजाचे नुकसान करत आहेत. हा सुसाईड बॉम्ब समाजाला घेऊन नुकसान पोहोचवेल. त्यामुळे निश्चितपणे याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील. शरद पवार आपली भूमिका स्पष्ट न करता परस्पर जरांगे यांच्यासारखे सुसाईड बॉम्ब महाराष्ट्रात वापरतात याचे दुर्दैव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आता संजय केनेकर यांच्या दाव्यावर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. एकीकडे मराठा समाजाचं आंदोलन सुरु असताना राज्य सरकारने मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.






