शिरूर (रिपोर्टर) मानूरच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज होत असून या कार्यक्रमाला भक्तांची मांदियाळी मोठ्या प्रामणावर दिसून आली. पंचक्रोशीतील हजारो भक्तगण कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्याने भक्तांचा आलोट महासागर लोटला तर दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावल्याने नेत्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात दिसून आली.
श्री संत वामनभाऊ यांच्या विचाराशी नतमस्तक होत गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह या वर्षी मानूरमध्ये होत आहे. या सप्ताहाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने झाली. या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील हजारो अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. श्री संत वामनभाऊ यांचे आशीर्वाद मिळावेत आणि हरिकीर्तनाचा लाभ व्हावा यासाठी अर्जुन आणि त्याच्या मुलाचं वास्तव्य असणारी मानूर नगरी भक्तीने आज फुलून गेली होती. या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी पालकमंत्री पंकजा मुंडे, माजी बांधकाम मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे, प्रतापराव ढाकणे, भीमराव धोंडे, मोनिकाताई, राजेंद्र मस्के यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गडाचा आणि भक्तांचा नातं पिढ्यान् पिढ्या न तुटणारा असल्याचे सांगून ज्यांच्या प्रतिमेला पाहून दरारा वाटतो, असे वामनभाऊ हे धर्माचं व्यासपीठ आहे, राजकीय नाही. असे म्हणत अध्यात्माचं काम संसाराची इमारत ढासळू न देणं हे असतं. अर्जुन आणि त्याच्या मुलाचं वास्तव्य असणारी नगरी म्हणून मानूर नगरी असल्याचे त्यांनी या वेळी म्हटले तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही या वेळी आपले विचार मांडले.