स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा पिकांना जबरदस्त फटका बसला. फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या. नवगण राजुरी शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाहणी केली असता कापसाला पीक विमा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. या पावसामुळे मराठवाड्यासह इतर विभागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतला. बीड तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते. कापूस फुटलेला होता तोच पावसाने हजेरी लावल्याने सर्व फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या. यात शेतकर्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. खरीपात पावसाने दगा दिल्याने उत्पादनावर परिणाम झाला होता. आता अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी कोंडीत सापडला. नवगण राजुरी शिवारातील पारगाव शिरस, पेंडगाव, सौंदाना, खापर पांगरी यासह आदी ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू गायके यांनी शेतात जावून पिकांची पाहणी केली. या वेळी पांडुरंग काकडे, गोकर्ण कतले, भारत कतले, सुखराज कतले, मनोहर काकडे, शहादेव घोलप, चंद्रसेन जाधव, त्रिंबक काकडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. दरम्यान कापसाा शंभर टक्के विमा देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू गायके यांनी केली आहे.