रायगड (रिपोर्टर): आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन ही घोषणा केली. बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहे. परंतु इतर काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणार्या काही जागा आपण लढवणार आहोत. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्या प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. पाच राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होईल. राज्य विधानसभेचे अधिवेशन 7 फेब्रवारीपासून होत आहे. त्यात पूर्णअर्थसंकल्प मांडता येणार नाही. परंतु महत्वाच्या कामांना निधी मंजूर केले जातील, असे अजित पवार यांनी म्हटले. मी जलसंपदा मंत्री असताना माझ्यावर अनेक आरोप झाले. काही जण म्हणतात की, यांच्यावर केसेस होत्या म्हणून हे तिकडे गेले . मी कॅबिनेटमध्ये त्या खात्याचा मंत्री होतो म्हणून मला टार्गेट केलं गेले. पण ते आरोप सिद्ध झाले नाही. मंत्री आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ते आदेश दिले होते. माझ्यावर जे आरोप झाले जलसंपदा विभागाची त्यानंतर त्याचा विकास रेंगळाला. मी कामाला मान्यता देतो म्हणुन मला टार्गेट करण्यात आलं. त्यावेळी नेमलेल्या समितीचा अहवाल आला आणि त्यांनी मला क्लीन चीट दिली. 32 वर्ष मी काम करतोय मला विचारलं जातं माझ्यावरच आरोप का होतात. परंतु मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्याकडे जीएसटी विभाग देखील होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, असे अजित पवार यांनी सांगितले.