गेवराई : (रिपोर्टर) तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. दररोज 50 ते 60 वाहनांव्दारे अवैध वाळूची वाहतुक करून ती विक्री केली जात आहे. या वाळू माफियांना गेवराई महसूल व पोलीस प्रशासनाचे आशिर्वाद असून तालुक्यातील अनेक ठिकाणी गोदा पात्रात वाळू माफिया नंगानाच करत आसल्याने प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आसल्याचे उघडपणे दिसून येत आहे.
गेवराई तालुक्यातील गुळज, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, म्हाळस पिंपळगाव, खामगाव, संगम जळगाव, आगर नांदूर, गोंदी, हिंगणगांव, राहेरी, गंगावाडी, राजापूर यासह 32 ते 33 गावांमधून गोदावरी नदी वाहते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने गोदावरील नदी दुथडी वाहत आहे. यामुळे अवैध वाळूचा धंदा करणार्यांची अडचण झाल्याचेही दिसत असले तरी त्यांनी त्यातही पर्याय शोधले आहेत. प्रशासनाकडून गेवराई तालुक्यात अधिकृत वाळू घाटांचा लिलाव केलेला नाही. असे असताना तालुक्यातील गोदावरील नदीपत्रात केनीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळूचा बेसुमार उपसा केला जात आहे. नदीपात्रातून वाळू उपसून ती काठावर साठवून ठेवली जाते. तेथून हायवा, ट्रॅक्टर, ट्रक या वाहनांमधून शहरात पुरवठा केली जाते. वाळूचा उपसा करण्यासाठी ट्रॅक्टरचलित यंत्र (केनी) चा वापर केला जातो. उपसलेली वाळू घेवून शहरांमध्ये धावणार्या वाहनांमुळे रस्त्यावरून वाहतुक करणार्या छोट्या वाहनचालकांना या वाहनांचा त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा वाळूमाफीयांच्या दादागिराची त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे.
या अवैध वाळूच्या उपशामुळे ग्रामीण भागातील शांतता भंग होत आहे. अवैध वाळूवर नियंत्रण, थेट कारवाईसाठी महसुल प्रशासन कार्यरत आहे परंतु या प्रशासनाला गेवराई तालुक्यातील वाळूचा उपसा रोखण्यासाठी वेळच मिळत नसल्याची संतप्त भावना नागरीकांमधून व्यक्त केली जात आहे.
साठवणूकीसाठी जागा नसल्याने या वाळू माफियांनी रस्त्यावरच वाळूचा साठा करत आहेत. यामुळे रस्त्यावरही आता वाळूचे ढिगारे जमा झाले आहेत. राक्षसभुवन येथे अनेक ठिकाणी रस्त्यावर वाळू टाकण्यात आल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र राजरोसपणे अवैध वाळू उपसा करणार्या माफियांना गेवराई महसूल व पोलीस प्रशासनाचेच आशिर्वाद असल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणी गोदा पात्रात वाळू माफिया नंगानाच करत आसताना प्रशासनाचे मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आसल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारे सुरु असलेल्या या अवैध वाळू उपस्याबाबत जिल्हाधिकार्यांनी लक्ष देवून थेट कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील गोदाकाठच्या गावातील नागरीकांमधून केली जात आहे.









