बीड (रिपोर्टर)ः- मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात 7, 8 आणि 14 ते 20 मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने तब्बल 1 लाख 53 हजार 947 शेतकर्यांच्या 99 हजार 634.47 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा केला. तर मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सोमवारी (20 मार्च) रोजी विभागीय आयुक्तालयाच्या वतीने आठही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील 22 मार्चपर्यंत केवळ 26.21 टक्केच पंचनामे पूर्ण होऊ शकले आहेत. तर बीड जिल्ह्यात केवळ 13 टक्के पंचनामे झाले आहेत. त्यामुळे शेतकर्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे.
सरकारी कर्मचार्यांनी संप मागे घेऊनही नुकसानीच्या पंचनाम्याला गती नाहीआधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे मोठं नुकसान झाले. त्यातच 7, 8 आणि 14 ते 20 मार्चदरम्यान मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वार्यासह गारपीट झाल्याने पिके अक्षरशः आडवे झाली आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. असे असताना शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले होते. मात्र संप मागे घेतल्यावर देखील नुकसानीच्या पंचनाम्याला गती मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण मराठवाड्यात कालपर्यंत (22 मार्च) फक्त केवळ 26.21 टक्केच पंचनामे पूर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे पंचनामे करण्यासाठी उशीर होत असेल तर नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात 19 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत; सहाशे हेक्टर फळबागाचे, 18 हजार हेक्टरपेक्षा जास्त बागायत, जिरायत क्षेत्राचे झाले नुकसान
बीड, :-बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपिठ झाली. या अवकाळी पावसाने रब्बीसह फळपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करणे सुरू असून दोन दिवसात झालेल्या पंचनाम्यात अंदाजे 19 हजार 90 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये 687 फळपिके, 9 हजार 153 बागायत आणि 9 हजार 250 जिरायत क्षेत्र बाधीत झाल्याचे समोर आले. पंचनामे पुर्ण होण्यास आणखी 3 दिवसांचा कालावधी लागेल.
महसुल विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, मात्र महसूल कर्मचारी, तलाठी, महसुल कृषी सहाय्यक आदी कर्मचारी रजेवर असल्याने या पंचनाम्याला दिरंगाई झाली. संपकाळातही पंचनामे सुरू असले तरी या कामाला अद्याप गती आली नव्हती, मात्र कर्मचार्यांनी संप मागे घेतले असल्याने कामाला गती आली असून जिल्ह्यातील फळबाग, बागायती आणि जिरायती शेतपिके नुकसान झाल्याचे पंचनामे सुरू आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये जवळपास 29 हजार 179 शेतकरी बाधीत झाले आहेत. तर 327 गावातील हे नुकसान आहे. जिरायत क्षेत्रापैकी 9 हजार 250 जिरायत क्षेत्र, बागायत क्षेत्रामध्ये 9 हजार 153 हेक्टर तर फळपिकात 687 हेक्टर नुकसान झाले आहे. आतापर्यंत 2 हजार 605 हेक्टरवरील पंचनामे झाले असून टक्केवारीच्या स्वरूपात आतापर्यंत 13 टक्केच पंचनामे पुर्ण झाले आहे. येत्या 2-3 दिवसात हे पंचनामे पुर्ण झाले तर शासनाला अहवाल पाठविले जाईल आणि नुकसानभरपाईसाठी आपत्ती निवारण निकषानुसार किती रूपये लागतील याची मागणी राज्यसरकारकडे करण्यात येईल अशी माहिती दै. रिपोर्टरला निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली.