———————
गेवराई (रिपोर्टर) तालुका कृषी अधिकारी कार्यालय गेवराई अंतर्गत जातेगाव मंडळ कृषी अधिकारी कार्यालय असून गेल्या तीन वर्षांपासून हे कार्यालय कायम बंद आसून यामुळे परिसरातील जवळपास 25 ते 30 खेड्यांमधील लोकांना छोट्या मोठ्या कामांसाठी गेवराई येथे चकरा माराव्या लागत आसून हे कार्यालय तात्काळ चालू करून संबंधित अधिकारी यांनी रोज या कार्यालयात हजर रहावे अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील शेतकर्यांची सोय व्हावी यासाठी कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक मंडळात मंडळ कृषी कार्यालय केलेले आहेत. त्याप्रमाणेच जातेगाव येथे असलेल्या मंडळाचे अधिकारी हे या कार्यालयात कधीच हजर राहत नसून उंटावरून शेळ्या हाकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांना गेवराई कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
मात्र तिथे गेल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी जातेगाव यांची कधीच भेट होत नाही. त्यांना फोन केला तर त्या शेतकर्यांचा फोनही उचलत नाहीत याबाबत अनेकवेळा वरिष्ठांना मागणी करूनही दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्यांची गैरसोय होत असून हे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय तात्काळ चालू करण्यात यावे व संबंधित अधिकारी यांनी रोज या कार्यालयात बसून शेतकर्यांची कामे करावीत अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली असून याबाबत आ.लक्ष्मण पवार, जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना भेटून रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे परिसरातील अनेक शेतकर्यांनी सांगितले आहे.
दरम्यान यापूर्वी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय हे जातेगाव येथे चालू होते परंतु सध्या संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांनी त्यांच्या सोयीनुसार गेवराई येथे आणले व स्वतःची सोय करून घेतली परंतु अनेक शेतकर्यांना त्यांच्या केलेल्या कामाविषयी किंवा काही अडचणी विषयी माहिती मिळत नाही तसेच सध्या शासनाचा पीएम किसानचा ई केवायसी चा कार्यक्रम चालू आहे. आधार लिंक करणे इत्यादी छोट्या छोट्या कामासाठी प्रत्येक शेतकर्याला वयस्कर माणसांना गेवराई येथे तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते आहे. त्यामुळे सदरील शेतकर्यांचा ताण कमी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी कार्यालय सुरू झाले पाहिजे अशी शेतकर्यांची मागणी आहे.