गेवराई (बीड) : तब्बल आठ महिन्यांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा गेवराई पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मयताची पत्नी, मेव्हणी व साडू यांनी संगनमताने खून केल्याचे निष्पन्न झाले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढरवाडी फाटा येथील कचरा डेपो परिसरात दि. ३ सप्टेंबर २०२५ ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान उध्दव तुकाराम शिंदे (वय ५०) हे पत्नी संगीता शिंदे यांच्यासह पुण्यावरून नातेवाईकांकडे आले होते. घरगुती वादातून दि. ६ सप्टेंबर रोजी दोघांमध्ये तीव्र भांडण झाले. याच रागातून संगीता शिंदे हिने तिची बहिण सविता वाजे व भाऊजी विष्णू वाजे यांच्या मदतीने उध्दव शिंदे यांचा गळा आवळून खून केला.
खून केल्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह प्रथम उसाच्या शेतात टाकला. नंतर दोन-तीन दिवसांनी गोणीत भरून मोटारसायकलवरून शहागड येथील जुन्या पुलावरून गोदावरी नदीत फेकून दिला. तसेच मृताची मोटारसायकलही नदीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, संशय टाळण्यासाठी मुख्य आरोपी संगीता शिंदे हिने पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात पती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, दि. २ मे २०२६ रोजी मयताचा मुलगा शुभम शिंदे याने वडिलांच्या बेपत्ता होण्याबाबत शंका व्यक्त करत गेवराई पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत संशयितांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींना पोलिसी चौकशीचा धाक दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आरोपींच्या अल्पवयीन मुलांचाही सहभाग उघड झाला असून त्यांच्याकडूनही माहिती घेण्यात आली.
या प्रकरणी शुभम शिंदे यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६८/२०२६ अन्वये भा.न्या.सं. कलम १०३(१), २३८, ६६(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून गोदावरी नदीत टाकलेल्या मोटारसायकलीचा सांगाडाही पोलिसांनी जप्त केला आहे.
या संपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक लंके करीत आहेत.










