कोट्यधवधीच्या भूसंपादन घोटाळ्यात मोठी कारवाई
प्रशासकीय वर्तुळात खळबळ
अविनाश पाठकांना लातुरातून घेतले ताब्यात, आज न्यायालयासमोर हजर करणार नंतर बीडमध्ये आणण्यात येणार
लातूर/बीड (रिपोर्टर): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील बहुचर्चीत आणि कोट्यवधी रुपयांच्या कथीत घोटाळ्याप्रकरणी आज मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. सध्या ते लातूरच्या पोलीस ठाण्यात असून त्यांना आज लातूर न्यायालयात हजर करून पुढील चौकशीसाठी बीडमध्ये आणले जाणार आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई करण्यासाठी तपासी अधिकार्यांनी गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या हालचाली सुरू ठेवल्या होत्या. आज बीडमधून तीन पथक लातूरला गेले होते. असेही सांगितले जाते.
या खळबळजनक आणि प्रशासकीय वर्तुळात सनसनी निर्माण करून सोडणार्या घटनेची अधिक माहिती अशी की, धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत तब्बल 73.4 कोटींचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप होता. या प्रकरणात मूळ भूसंपादन निवाडा सुमारे 68.58 कोटी रुपये असताना बनावट आदेश आणि खोट्या मंजुरीच्या आधारे तब्बल 241.62 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. हा संपूर्ण प्रकार अवघ्या 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 या 48 दिवसांच्या कालखंडात घडल्याचे निष्पन्न झाले. महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, खासगी वकील, एजंट यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केले.
त्यात तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या बनावट स्वाक्षर्या की अधिकृत वापरून वाढीव भरीव मंजुरी करण्यात आल्याचा गंभीर आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. तपासादरम्यान 154 बनावट आदेश तयार करण्यात आल्याचे समोर आल्याचे सांगण्यात येते. या अदोशाच्या आधारे शेतकर्यांच्या खात्यावर सुमारे 75 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर संबंधितांकडून पाच ते पंधरा टक्के कमिशन घेण्यात आल्याचे सांगितले जाते. काही आरोपींच्या कबुली जबाबातून हे समोर आल्याचे बोलले जाते. याबाबत स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने अनेक खुलासे केले असून सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधिक्षक पुजा पवार या करत होत्या. त्यांनी अनेक महत्वाचे कागदपत्रे, मंजूर फाईल आणि आर्थिक व्यवहारांची छानणी केली मात्र त्या रजेवर गेल्यानंतर तपासाची जबाबदारी एम.व्यंकटराम यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर आरोपींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. आतापर्यंत दहा पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल असून काही जण अटकेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून या प्रकरणातला मोठा मासा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या. आज सकाळी पोलीसांचे तीन पथक लातूरमध्ये डेरेदाखल झाले. त्यांनी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ताब्यात घेऊन स्थानीक पोलीस ठाण्यात नेले. आज दुपारपर्यंत त्यांना न्यायालयासमोर हजर करून बीडला आणण्यात येणार आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
देशात प्रथमच विद्यमान आएएस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात
आतापर्यंत विविध कारवायांमध्ये एकतर सेवानिवृत्त आयपीएस, आयएएस अधिकार्यावर अटकेची कारवाई झाल्याचे सांगण्यात येते मात्र देशात ही पहिली कारवाई अशी आहे की, नोकरीत आणखी पाच वर्षांचा कालखंड शिल्लक असलेल्या आयएएस अधिकार्याला भ्रष्टाचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात प्रमुख लक्ष
बीडमधील जालेला भूसंपादन घोटाळा राज्य सरकारच्या केंद्रस्थानी होता. मुख्यमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकरणात कोणालाही सोडणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची प्रत्येक अपडेट घ्यायला सुरुवात केली आणि गेल्या दोन दिवसापूर्वी एसआयटी अॅक्शन मोडवर आली.
एसपी काँवत भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळच
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी निव्वळ यासाठी काँवत यांची गेल्या दीड वर्षांपूर्वी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. माफियांबरोबर आर्थिक घोटाळा करणार्यांनाही एसपी काँवत यांनी चांगलेच अंगावर घेतले. या प्रकरणात काँवत यांची दूरदृष्टी, भ्रष्टाचारी सुटणार नाहीत यासाठी कायदेशीर कागदांची जमवाजमव आणि स्वाक्षरी खरी की खोटी आणि तिचे वय काय? याची सीआयडी व फॉरेन्सिक माहिती (रिपोर्ट) तात्काळ मागून गेतला. त्यामुळे ही आजची कारवाई पहायला मिळते.







