गेवराई (रिपोर्टर)
देशात सुरू असलेल्या संविधानविरोधी भूमिकेमुळे सर्वसामान्यात भिती असून धर्मांध शक्ती विशिष्ट समाजाला टार्गेट करत त्यांच्यावर सर्रासपणे अन्याय करत असल्याचे चित्र बिल्कीस बानो बलात्कारीत शिक्षा भोगणार्या आरोपींना मोकाट सोडल्यानंतर उभ्या जगाने पाहिले. त्यापाठोपाठ मुस्लिम समाजावर होत असलेले हल्ले आणि समाजात निर्माण झालेली असुरक्षितेची भावना यातून उफाळलेल्या संतापातून आज केंद्र सरकारविरोधात गेवराईमध्ये संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या महिलांनी तहसिलदारांना निवेदन देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
केंद्र सरकार सातत्याने अल्पसंख्याक समाजाला अन्याय करत आहे. बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचार करून त्यांच्या नातेवाईकांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात आरोपी सिध्द झाले होते. ते शिक्षा भोगत असताना त्यांना निर्दोष सोडण्यात आले. त्यामुळे गेवराईत संतप्त झालेल्या हजारो महिला एकत्र होत तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार जाणिवपूर्वक अल्पसंख्याक समाजावर अन्याय करत आहे. हजरत मोहमद (स) बद्दल वारंवार अपमानजनक टिप्पणी करण्यात येत आहे. बिल्कीस बानोंवर बलात्कार करणार्या व त्यांच्या नातेवाईकांची हत्या करणारे बलात्कारी यांची सुटका रद्द करावी यासह भारतातील अल्पसंख्याक समुदायावर होणार्या अत्याचार विरूध्द कडक कायदा करावा यासह विविध मागण्या घेवून हजारो महिला तहसिल कार्यालयावर धडकल्या. गेवराईत संविधान बचाओ संघर्ष समितीच्यावतीने गुरूवार दि.15 सप्टेंबर रोजी शहरातून प्रचंड मुक मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीला गेवराई शहरासह तालुक्यातील महिलांनी प्रतिसाद देत मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. हजारो महिला एकत्र होत आपल्या मागण्या घेवून तहसिलदारांना निवेदन दिले.