एस.पी.शुगर अॅन्ड अॅग्रो.प्रा.लि. कारखान्याचे भूमिपुजन
अकरा महिन्यात कारखाना सुरू करणार -सुरेश पाटील; गजानन कारखान्याला गजाननाचा आशीर्वाद -आ.संदीप क्षीरसागर
अनंत लांडे । घाटसावळी
आमच्या मनगटात ताकद आहे, जमीनी कसण्याची आमच्यात रग आहे पण कायम आमच्याकडे दुष्काळ असायचा. हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जायचा. मला वाटायचे हा कलंक कधी पुसला जाणार आहे की नाही, मात्र आता बाहेरून येथे कारखान्यासारखे उद्योग येत आहेत. लवकरच हा जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नाही तर ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. नियत साफ असली तर कारखान्यामधील वायराचा तुकडाही उंदीर कुरताडत नाहीत, आमची नियत नियत साफ आहे. आम्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून असणारी ओळख पुसायची आहे, असे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले.
ते घाटसावळी येथील एस.पी. शुगर अॅन्ड अॅॅग्रो प्रा.लि. या कारखान्याच्या पायाभरणी शुभारंभ प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री संजय बनसोडे, बजरंग बप्पा सोनवणे, शांतीब्रम्ह ह.भ.प. नवनाथ महाराज मनोहर डाके, रेखा फड, भाऊसाहेब डावकर, रमेश चव्हाण, सुनील पाटील, सोमनाथ माने, दादासाहेब लांडे, प्रकाश ठाकूर, डी.बी. बागल, बबनराव गवते, शेषेराव जगताप यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, सुरेश पाटलांनी बीडमध्ये कारखाना सुरू केला. त्याबद्दल त्यांचे आभार आणि अभिनंदन. रोज साडेतीन हजार टन ऊस गाळप करणारा हा कारखाना आणि इथेनॉल प्रकल्पाला मंजुरी त्यामुळे या भागातील शेतकर्यांचे आता कल्याण होणार आहे. या भागातील ऊसतोड मजूर पोटाची खळगी भरायला पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक भागात जायचा त्या भागातील माणूस आता इथेच ऊसउत्पादक म्हणून होईल. आमच्या मनगटात ताकद आहे, जमीन कसण्याची रग अहे परंतु आम्हाला कायम दुष्काळ असायचा. गेल्या तीन वर्षाच्या कालखंडात चांगला पाऊस झाला, ऊसउत्पादक शेतकरी वाढले, ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ओळख होती ती आता लवकरच पुसली जाईल. ऊसउत्पादक शेतकर्यांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची नवी ओळख होईल आणि ही ओळख माझ्या हाताने होतेय, याचा मला आनंद आहे. येडेश्वर कारखान्याचे पायाभरणी ते शुभारंभ माझ्या हाताने झाला. त्यांचे एकाचे दोन झाले. संदीप भैय्यांनी गजानन सुरू केला, आणखीही एक-दोन होतील. भैय्याला नेहमी म्हणायचो, गजानन कारखाना सुरू करा, नियतीचे आशीर्वाद किती चांगले असतात तेरा वर्षे बंद पडलेल्या कारखान्याचे साधे वायरही उंदरांनी कुरतडले नाही कारण नियत चांगली, गजाननाचे त्याच्यावर आशीर्वाद आहे. सुरेश पाटील यांनी माझ्या जिल्ह्यात उद्योग उभारले, माझ्या जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांची होती ती आता उद्योग येत असल्यामुळे पुसली जार्सल आणि माझ्या जिल्ह्याची ओळख उद्योगाचा जिल्हा म्हणून होत आहे, सुरेश पाटलांच्या या उद्योगामुळे बेरोजगारांच्या हातालाही काम मिळणार असल्याचे सांगत निसर्गाने आमच्यावर अशी कृपा ठेवावी, असेही या वेळी धनंजय मुंडे यांनी म्हटले.
ऊसतोड मजुरांना आता मजूर मिळणार -आ.बनसोडे
माजलगाव तालुक्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न सातत्याने चर्चीला जात आहे. ज्या ज्या भागामध्ये अतिरिक्त ऊस असेल, त्या भागातल्या अतिरिक्त उसाचे गाळप आता हा कारखाना करेल. या भागातील लोकांना रोजगार मिळेल, असे सांगत आ. बनसोडे यांनी कारखान्याचे चेअरमन सुरेश पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि मेहनतीचे कौतुक केले. सेवानिवृत्तीत काम करणारा हा माणूस सेवाभावाने काम करत असल्याचे सांगून महाराष्ट्रात हा कारखाना नंबर एकचा होणार आहे.
गजानन कारखान्याला गजाननाचा
आशीर्वाद -आ. संदीप क्षीरसागर
माझ्या मतदारसंघामध्ये सुरेश पाटलांनी कारखाना काढला. इथल्या शेतकर्यांचे प्रश्न आता मिटले जाणार, बेरोजगारांना नोकर्या मिळणार त्यामुळे पाटलांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. ऊसउत्पादक शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक व्हायची ते आता होणार नाही. सहकारी साखर कारखाने चुकीच्या पद्धतीने चालवण्यात आले म्हणून ते अडचणीत आले. शरद पवार साहेबांनी मध्यंतरीच्या काळात कारखान्यांना मदत केली, वैद्यनाथ कारखान्याला सुद्धा मदत केली. मी जो गजानन कारखाना घेतला आहे, तेरा वर्षे बंद पडलेला कारखाना उंदराने साधा वायरही कुरतडला नसल्याचे सांगत गजानन कारखान्याला गजाननाचा आशीर्वाद असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगून धनुभाऊ आणि माझ्या नशिबी संघर्ष आहे, बंद पडलेले सर्व कामे आम्हालाच करायचे आहेत, असेही संदीप क्षीरसागर या वेळी म्हणाले.
धनंजय मुंडे पाठिशी; अकरा महिन्यात
गाळप सुरू करू -सुरेश पाटील
एस.पी. शुगर अॅन्ड अॅग्रो. प्रा.लि.चे सर्वेसर्वा सुरेश पाटील प्रस्तावना करताना म्हणाले की, कारखाना क्षेत्रामध्ये मला पुर्ण अनुभव आहे. गेल्या तीस वर्षांच्या कालखंडात कुठे शेतकी अधिकारी, कुठे संचालक, कुठे चेअरमन असे काम करत आलो आहे. त्यामुळे ऊस उत्पादनापासून ऊस गाळपापर्यंत मला चांगला अनुभव आहे. या भागात कारखाना काढण्यासाठी मी आधी मांजरसुंबा परिसरामध्ये प्रयत्न केला मात्र त्याठिकाणी दोन कारखान्याच्या अंतराची अडचण आली, परंतु घाटसावळी परिसरामध्ये जागा भेटली. एकीकडे माजलगावचा कारखाना तर दुसरीकडून संदीपभैय्यांच्या कारखान्याचे 25 कि.मी.चे अंतर जुळून आले. या भागात जमीनीसाठी 10 कोटी रुपये खर्च करून 5 हजार टनाच्या गाळपाचा कारखाना आपण याठिकाणी काढत असल्याचे सांगितले. ऑक्टोबर 2023 पर्यंत गाळप सुरू करण्याचे मानस व्यक्त करून सुरेश पाटलांनी आतापर्यंत 5 हजार सभासद असल्याचे सांगितले. नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये शेतकर्यांना शेअर्स देऊ, असे म्हणत पहिल्या वर्षी कारखान्याचे गाळप हे दहा लाखपर्यंत नेऊ, याभागामध्ये ऊसउत्पादन करून दाखवेल अन्य कारखान्यांना अडचण येणार नाही याची दक्षता घेऊ. शांतीब्रम्ह नवनाथ महाराज यांचे आशीर्वाद, धनंजय मुंडेंचे आशीर्वाद आणि अन्य सर्वांच्या सहकार्यातून या कारखान्याची यशस्वीरित्या उभारणी करत गाळप करणार असल्याचे सांगून इथेनॉल प्रकल्पालाही आपल्याला मान्यता मिळाल्याचे त्यांनी म्हटले.