गुटखा माफियांना मोकळीक,टपरी चालकांवर कारवाई
दुध, तेलाच्या भेसळीचे काय? कोद्रा भगरीत कितीची तडजोड?
सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळू नका
बीड (रिपोर्टर) हप्ताखोरीत बरबटलेल्या अन्न भेसळ औषध विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांचे जीव धोक्यात आले असून अन्न भेसळ विभाग कारवाईच्या नावाखाली किरकोळ पान टपर्यांना टार्गेट करत गुटखा माफियांकडे दुर्लक्ष करते. त्याच बरोबर किराणा दुकानातील अन्न धान्य, तेल, अन्य खाद्य पदार्थ उत्कृष्ट आहे की निकृष्ट हे न पाहता मासिक हप्ता घेवून लोकांच्या माथी सर्रास निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य विक्रीस नफेखोर व्यापार्यांना परवानगी दिली जाते. भगरीमधून शेकडो जणांना विषबाधा झाल्याने सर्वसामान्यांचा जिव टांगणीला लागुन हा महत्वपूर्ण विषय ऐरणीवर आला आहे. वरई आणि सावा नावाची वनस्पतीतून निर्माण झालेली भगर उच्च दर्जेची आणि जास्त भावाची आहे मात्र काही नफेखोर व्यापारी कोद्रा नावाची भगर सर्रासपणे विकतात. सदरची भगरच ही केमिकल युक्त असल्याचे काही व्यापार्यांचे म्हणणे आहे. त्यादिवशी हि कोद्रा नावाची भगर संबंधीत एजन्सीकडून जप्त करण्यात अन्न भेसळ विभागाला सपशेल अपयश आले आहे.
राज्यातील सर्वसामान्यांच्या जान आणि मालची जबाबदारी ही शासन आणि प्रशासन व्यवस्थेची असते. मात्र बीडमध्ये अन्न भेसळ विभाग स्वत:च्या हप्तेखोरीपणा जपण्या हेतू लोकांच्या जान आणि मालच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसापूर्वी बीड जिल्ह्यात भगरीतून शेकडो जणांना विषबाधा झाली. सदरची भगर ही निकृष्ट दर्जाची, कोद्रा नावाची म्हणून ओळखली जाते. हि भगर वनस्पतीयुक्तही आहे की नाही? यावर कोणी ठाम सांगत नाही. सदरची भगर ही केमिकलमधून बनवल्याचे बोलले जाते आणि तिच भगर खाल्याने लोकांना विषबाधा झाली. मात्र ज्या एजन्सीमधून हि भगर घेतली गेली त्या एजन्सीमध्येच छापा मारला असता अन्न भेसळला ती भगर मिळून आली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार संबंधीत एजन्सीसोबत अन्नभेसळ अधिकार्यांची मोठी तोडपाणी झाली. काम दाखवायचे म्हणून अन्न भेसळचे अधिकारी किरकोळ टपर्या चालकावर सध्या कारवाया करत आहेत. गुटखा माफिये मात्र मोकाट सुटलेले आहेत. गुटखा कोठून कुठे येतो? किती येतो? त्याचे गोडावून कुठे आहे? रोज गुटखा किती जिल्ह्यात आणला जातो? तो कुठल्या गाडीने येतो? याची इत्यन्भूत माहिती अन्न भेसळ विभागाला असते. मात्र केवळ हप्ताखोरीमुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. गुटखामाफियांनी गुटखा जिल्ह्यात आणलाच नाही तर तो पानस्टॉल पर्यंत जाणार नाही. परंतू आपले पाप झाकण्यासाठी गुटखा माफियांबरोबर टपरी चालकांकडूनही हप्ता घेण्यासाठी अन्न भेसळ विभाग या छुटपूट कारवाया करताना दिसून येतात. लोकांना विषबाधा झाल्यानंतर अन्नभेसळने कुठल्याही किराणा दुकानात जावून वेगवेगळ्या साहित्यांची नमुने घेतले नाहीत. आपल्या हस्तकामार्फत मात्र भगर विकू नका एवढा मॅसेज लोकांपर्यंत दिला. अन्नभेसळच्या या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्यांच्या थेट जिवावर बेतत आहे. यामुळे जिल्हाधिकारी अन्न भेसळच्या हप्तेखोरपणाला आळा लावत निकृष्ट माल विकणार्या नफेखोर व्यापार्यावरही कारवाई करावी.
ओरड होते म्हणून चांगल्या व्यापार्यांना टार्गेट करू नका
अन्न भेसळच्या हप्तेखोर धोरणामुळे सर्वसामान्य लोकांचा जिव धोक्यात आहे. निकृष्ट मालातून नफेखोरी कमावणार्या व्यापार्यांचा शोध घ्या. त्यांच्या मुसक्या बांधा. परंतू ओरड होते म्हणून चांगल्या व्यापार्यांना त्रास देवू नका. अडवणूक करू नका.
गुटखा माफियांच्या मुसक्या बांधा
टपर्यांना काय लक्ष करता
बीड जिल्ह्यामध्ये गुटखा आलाच नाही तर टपरीचालक गुटखा विकणार कुठून? माफियांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतात. अन कारवाया दाखवण्या हेतू टपरीचालकांना लक्ष करता. अन त्यांच्याकडूनही मोठमोठ्या रकमेची मागणी करता. अन्न भेसळची हि भूमिका संतापजनक आहे. आधी गुटखामाफियांवर थेट कारवाई करा.
दुधापासून तेलापर्यंतची आजपर्यंत काय कारवाई केली?
लोकांच्या रोजच्या जेवणामध्ये दुध, तेल यासह अन्य पदार्थ असतात. बीडमध्ये दुध आणि तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. नफेखोर व्यापारी याचा लाभ घेतात. याची माहिती अन्न भेसळकडे आहे. त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का करण्यात आली नाही?
जिल्हाधिकार्यांनी भगरीच्या कारवाईची माहिती घ्यावी
जिल्ह्यातील शेकडो लोकांना भगरीतून विषबाधा झाली, ती भगर अत्यंत निकृष्ट कोद्रा म्हणून ओळखली जाते. नफेखोर व्यापारी हि भगर आणतात आणि लोकांच्या जिवाशी खेळतात. अन्न भेसळला या भगरीची माहिती आहे. काल परवा जी कारवाई झाली, त्या कारवाईत हि कोद्रा भगर मिळून आली नाही. विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने संबंधीत दुकानदारांसोबत अधिकार्यांनी तोडपाणीच केली. याकडे जिल्हाधिकार्यांनी लक्ष देत माहिती घ्यावी. अन दोषींवर कठोर कारवाई करावी.