बीड (रिपोर्टर) भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात अनेक विषयांवर सूचक विधानं केली. मात्र पक्षामध्ये नाराज असल्याच्या चर्चांवर त्यांनी थेट भाष्य करताना एक इच्छा व्यक्त केली आहे. दुपारी दीड वाजता पंकजा खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले, महादेव जानकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसमवेत कार्यक्रम स्थळी पोहोचल्या. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी अगदी 2024 च्या निवडणुकीपासून ते नाराजीबद्दल अनेक विषयांवर भाष्य केलं.
गडावर दाखल झाल्यानंतर पंकजा आणि प्रितम मुंडे यांनी आरती केली. यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने पंकजा मुंडे भाषणासाठी उभ्या राहिल्या. जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना हा मेळावा संघर्ष करणार्यांचा असल्याचं पंकजा यांनी म्हटलं. हा मेळावा चिखल फेकणार्यांचा नाही तर चिखल तुडवणार्यांचा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे. जे गोपीनाथ मुंडे यांचे विरोधक होते तसेच ज्यांनी मला विरोध केला त्यांच्याबदल तो विरोध करताना पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी कधीही बोलले नाही. कधीही कुणावर वैयक्तिक आरोप केले नाही, खालच्या पातळीवर जाऊन मी कधीही टीका केलेली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीबद्दल बोलून आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही, असं म्हणत पंकजा यांनी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधकांना सूचक इशारा दिला.
मुंबईमधील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यांची तयारी आणि चर्चा असतानाच पंकजा यांनी मात्र आपल्याकडे समर्थकांना बसायला खुर्चा देण्याचीही ऐपत नसल्याचं म्हटलं. हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं, अशी शेरोशायरी करत पंकजा यांनी, इथं जमलेले लोक ही ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नाहीत. तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं यासाठी मी तुमचे आभार मानते, असं म्हणत समर्थकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आपण कोणासमोरही झुकणार नाही असं पंकजा यांनी आपल्या भाषणात म्हटलं. कुणाचे जोडे उचलणार्यांचं कधीच इतिहासात नाव झालेलं नाही. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणार्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही, असा शब्द पंकजा यांनी समर्थकांना दिला.
भाषणाच्या शेवटाकडे पंकजा यांनी त्यांच्या नाराजीबद्दल सुरु असणार्या चर्चेवर भाष्य केलं. माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. माझी इच्छा आहे की, तुम्ही कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. इतके दिवस मी कधीच यावर बोलले नाही. मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मी मंत्री असताना मोनिका राजळे आणि इतरांना हाताने वाढून जेवू घालत होते. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय
संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण 2024 च्या तयारीला लागलं पाहिजे, असं पंकजा म्हणाल्या.
’हा चिखल तुडवणार्यांचा मेळावा’यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना कधी संघर्ष चुकला नाही, मलाही चुकणार नाही, असे म्हटले. पंकजा म्हणतात की, ’मेळावा म्हटलं की, टीका होते, चिखलफेक होते. पण आमच्या मेळाव्यात काय होईल, हे सर्वांनाच माहित आहे. आमचा हा मेळावा चिखलफेक करणार्यांचा नाही, चिखल तुडवणार्यांचा मेळावा आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
’मी कोणावर टीका करणार नाही’त्या पुढे म्हणतात की, ’मी कुणाविषयी काय बोलणार…मी माझ्या आयुष्यात, मुंडे साहेबांचे विरोधक किंवा माझे विरोधक, माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करणार्यांनाही कधीच काही बोलले नाही. मी कधीच संधीचा फायदा घेत, टीकाकारांना प्रत्युत्तर दिले नाही. मी कधीच कोणाविषयी वाईट किवा खालच्या पातळीवरचे भाष्य केले नाही, ते आमच्या रक्तातच नाही,’ असं पंकजा म्हणाल्या. तसेच, ’हकीकत को तलाश करना पडता है, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती है ।’ हा शेरही त्यांनी यावेळी ऐकवला.