बीड (रिपोर्टर) राज्य सरकारची उलथापालथ झाल्यानंतर पहिल्यांदाच नव्याने नियुक्त झालेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा निणयोजन सभागृहामध्ये जिल्हा नियोजन मंडळाची आढावा बैठक घेतली. यामध्ये प्रत्येक विभागाचा आढावा घेताना विभागाची तरतूद, आतापर्यंत खर्च झालेला निधी याची माहिती घेत असताना प्रत्येक शासकीय विभागाने आपल्याकडील निधी तातडीने खर्च करावा, निधी खर्च करताना अडचण येत असेल तर त्याही सांगाव्यात, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी अधिकार्यांना सूचना केल्या.
जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे पहिल्यांदाच पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या दौर्यावर आले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत होते. या बैठकीला आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह प्रत्येक विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन मंडळांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचे जिल्हा परिषद, नगर पालिका, महिला व बालकल्याण विभाग सह जिल्ह्याच्या एकूण 27 विभागांचा हा आढावा होता. एकूण आराखड्यातील प्रत्येक विभागाला दिलेला निधी, या निधी अंतर्गत राज्य सरकारकडून उपलब्ध झालेला निधी, त्या विभागाने दिलेल्या प्रशासकीय मंजुर्या, कार्यारंभ आदेश आणि प्रत्यक्ष झालेला खर्च आणि शिल्लक रक्कम याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेत असताना प्रत्येक खातेप्रमुखांकडून काही अडचणीही समजून घेतल्या. येत्या मार्चपर्यंत हा निधी तातडीने खर्च करा, आ. महोदयांकडून त्यांच्या विकासाचे प्रस्ताव मागून घ्या, विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दुसर्या बैठकीत मात्र मी कारणे ऐकून घेणार नाही, असेही या बैठकीत पालकमंत्री सावे यांनी अधिकार्यांना तंबी दिली.
आ.संदीप क्षीरसागरांनी
घेतली पालकमंत्र्यांची भेट
पालकमंत्री तथा सहकारमंत्री अतुल सावे हे आज बीड जिल्हा दौर्यावर असताना आ. संदीप क्षीरसागर यांनी सावेंची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार उपस्तित होते.