शाळा बंद झाल्यावर आमची लेकरं तलावातून जाणार का? गावकर्यांचा प्रशासनाला सवाल
बीड (रिपोर्टर) वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वस्तीशाळा राज्य सरकार बंद करत असल्याने यामुळे अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. बीड तालुक्यातील बेलगाव वस्तीवर वस्तीशाळा आहे. ही वस्तीशाळा बंद झाली तर विद्यार्थ्यांना अक्षरश: तलावातून गावातील शाळेत जावे लागणार. वस्ती शाळेतील नागरिकांनी वस्तीशाळेच्या समायोजनास तीव्र विरोध दर्शविला.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाने कमी पटसंख्या असलेल्या वस्तीशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. ग्रामीण भागात आजही नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींवर मात करत शाळेत जावे लागते. बीड तालुक्यातील बेलगाव वस्तीवर शाळा आहे, या शाळेचे इतर ठिकाणी समायोजन झाल्यास विद्यार्थ्यांना अक्षरश: जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागणार. समायोजनास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. सदरील ही बाब सामाजक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी निदर्शनास आणून दिली असून याबाबत त्यांनी गावकर्यांशी संवाद साधला व वस्तीवरील अवस्था किती भयानक आहे याचं वास्तवदर्शन त्यांनी दाखवून दिलं.