बीड, (रिपोटर):- 30 मार्च 2023 ही भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, मात्र गेल्या 18 मार्चपासून भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी ‘महाडिटीपी’ ही अर्ज भरण्याची वेबसाईट हँग झाली असून इयत्ता 11 वी, 12 वी आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्तीला पात्र असणार्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे बीड येथील सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे यांनी याबाबीची गंभीर दखल घेवुन महाडीटीबी ही वेबसाईट सुरळीत करावी अशी विद्यार्थ्यांतून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.
गेल्या 7-8 वर्षांपासून भारत सरकारची स्कॉलरशिप ही वेळेवर तर मिळतच नाही, मात्र किमान कॉलेजमधील पैसे आपल्याला भरावे लागु नये म्हणून मागासवर्गीय विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्तीचा अर्ज भरतात, प्रत्येक वर्षी 30 मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असते. मात्र गेल्या 18 तारखेपासून ही वेबसाईट हँग झाली असून आपले सरकार केंद्रावर स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थी चकरा मारतात, मात्र वेबसाईट हँग असल्याने त्यांना परत यावे लागते त्यामुळे बार्टीने आणि सामाजिक न्यायविभागाने याची गंभीर दखल घेवुन वेबसाईट सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.