निरपराध लोकांना पोलिसांनी त्रास देऊ नये
घटनाक्रमाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज फेसबुक लाईव्ह करणार
घर जाळपोळ, दगडफेकिस सर्वस्वी पोलिस प्रशासन जबबदार असल्याचाही केला आरोप
माजलगाव (रिपोर्टर): जळीतकांड प्रकरणी कोणाचेही नाव मी पोलिसांना सांगितले नाही. घरातील सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.तरी यात मला बदनाम केल्या जात आहे.मीच व्हिक्टीम असताना मलाच व्हीलन करण्याचा राजकीय डाव काही जणांकडून खेळला जात आहे.हे चुकीचे आहे. पोलिसांनी निरपराध तरुणांना त्रास न देत प्रत्यक्ष पुरावे असणार्यांवर गुन्हे दाखल करावेत.जळीत घटना प्रकरणाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह करणार असल्याचे आ. प्रकाश सोळके यांनी पत्रकार परिषदेत सांगत जाळपोळ दगडफेकिस सर्वस्वी पोलिस प्रशासन जबबदार असल्याचाही आरोप केला.
सोमवार दि.4 रोजी येथे सुंदर सोळंके महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की,माझ्या घरावर ज्यावेळी हल्ला झाला.तो प्रत्यक्ष मी पाहिला नाही. त्यामुळे जळीत कांड प्रकरणी मी पोलिसांना तक्रार दिली नाही. सदरील प्रकरणी पोलिसांनी प्रत्यक्ष पुराव्यावर गुन्हे दाखल केले आहेत. माजलगाव बंदच्या आंदोलनात जवळपास 5 हजार लोकांचा समावेश होता.परंतु हे सर्वच काही जाळपोळ व दगडफेकीस जबाबदार नव्हते.सीसीटीव्ही फुटेज व इतर प्राप्त झालेल्या व्हिडिओच्या घटनेवरून निदर्शनास येते की फक्त दोनशे ते अडीचशे लोकांचा यात समावेश आहे.बाकीच्यांना पोलिसांनी त्रास देऊ नये.तरीही पोलिसांनी बर्याच निरपराध लोकांवरही गुन्हे दाखल करत असल्याची मला माहिती मिळाली आहे.हे चुकीचं आहे.पोलिसांनी प्रत्यक्ष पुरावे आहेत त्यांनाच आरोपी करावं.पोलिसांची निष्क्रियता माजलगावातल्या जाळ पोळीच्या घटनेस जबाबदार आहे. त्यामुळे पोलिसांच्या सदरील जाळपोळ घटनेदरम्यानच्या निष्क्रियतेविषयी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सविस्तर निवेदन करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.तर जे निरपराध आहेत.त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.मतदार संघाचा आमदार या नात्याने मी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेस बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, जयसिंह सोळंके, सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती श्रीहरी नाना मोरे, नितीन दादा नाईकनवरे, चंद्रकांत शेजुळ, सुशील डक, अँड. भानुदास डक, राजेश मेंडके, कल्याण आबुज यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.
राजेंद्र होके, डोईजड, सावंत, राऊत
यांचे नाव आरोपपत्रातून वगळावे
सकळ मराठा समयवक राजेंद्र होके रामचंद्र डोईजड,लखन सावंत व अजय राऊत यांचे मराठा आरक्षणासंदर्भात योगदान आहे. प्रत्यक्ष जाळपोळ व दगडफेकीच्या घटनेत यांचा कोठेही संबंध येत नसल्याचे निदर्शनात येते.तरीही पोलिसांनी यांना आरोपी केले आहे. ते का केले आहे,हे लक्षात येत नाही.त्यामुळे पोलिसांनी विनाकारण आरोपी केलेल्या होके, डोईजड,सावंत,राऊत यांना आरोप पत्रातून वगळावे.